प्रतिनिधी / मिरज
मिरज शहरातील एसटी स्टँड येथून काही महिन्यांपूर्वी चोरट्यांनी चोरून नेलेले सुमारे साडेआठ टोळ्यांचे दागिने हस्तगत करून ते मुळ मालकांना परत करण्यात आले. महात्मा गांधी चौकी पोलिसांनी चोरीच्या घटनांमधील आरोपींना पकडून चोरीचा मुद्देमाल परत केल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
शहरातील एसटी स्थानकावर कोल्हापूरकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये चढत असताना पद्मश्री श्रीमंत वाडकर (रा. उचगाव, ता. करवीर) आणि पद्मश्री विजयकुमार पाटील (रा. मु. पो.किणी, ता. हातकणंगले) या महिला प्रवाशांच्या बॅगा चोरून चोरट्यांनी साडेआठ तोळ्यांचे दागिने लंपास केले होते. याबाबत दोन्ही महिलांनी महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावेळी पोलिसांनी संतोष टिल्या भोसले आणि वैशाली संदीप काळे (दोघे रा. तालखेड, ता. माजगाव, जि. बीड) या दोघा चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून चोरीस गेलेले दागिने हस्तगत केले होते.
जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या आदेशानुसार गांधी चौकी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांनी मूळ मालकांना बोलावून हस्तगत केलेले दागिने परत केले. पोलिसांनी चोरट्यांना पकडून दागिने परत मिळवून दिल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले.