प्रतिनिधी / मिरज
शहरातील रेल्वे स्टेशन, स्टँड, उत्तमनगर हा परिसर गेली काही महिने लुटारु टोळ्यांच्या कब्जात आहे. या भागात दररोज प्रवासी व नागरिकांना हत्याचारांचा धाक दाखवून लुबाडण्याच्या घटना होत आहेत. महात्मा गांधी चौकी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱया परिसरात पोलिसही या लुटारुंच्या दहशतीने जाण्यास धजत नसल्याचे चित्र आहे. पोलिस आमचे काहीही वाकडे करु शकत नाहीत, अशा उघड वल्गना देवून हे लुटारु लुटमार करीत आहेत. प्रवाशांच्या गर्दीने गजबजलेल्या बस स्थानकात थेट बसमध्ये शिरुन चालक आणि वाहकांना दमदाटी करुन प्रवाशांना लुबाडण्याच्या घटना घडल्या आहेत. या लुटारुंच्या टोळ्याबरोबरच गांजा व अन्य अंमली पदार्थांचे सेवन करणाऱया नशेबाज तरुणांच्या टोळ्याही कार्यरत आहेत. महात्मा गांधी चौकी पोलिस मात्र, केवळ बघ्याची भुमिका घेत हताश होण्यापलीकडे काहीही करु शकले नाहीत. त्यामुळे नागरिक आणि प्रवाशी संताप व्यक्त करीत आहेत. कार्यक्षम नसलेले हे पोलिस ठाणेच बरखास्त करावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
मिरज शहरातील रेल्वे स्टेशन, स्टँड परिसर, शिवाजी रोड, समतानगर, माणिकनगर हे भाग महत्त्वाचे आणि रहिवाशांनी गजबजलेले भाग आहेत. मिरज रेल्वे स्टेशन आणि बस स्थानकावर तर दररोज हजारो प्रवासी ये-जा करीत असतात. महाराष्ट्र आणि कर्नाटकातून आलेले शेकडो रुग्ण या भागात ये-जा करीत असतात. रात्री उशिरापर्यंत रेल्वे आणि बसची सोय असल्यामुळे याठिकाणी रात्रीच्यावेळीही रुग्ण व त्यांचे नातेवाईक येत असतात. शहरातील प्रमुख वर्दळींच्या भागांपैकी हे भाग आहेत. या भागात कायदा व सुरक्षिततेची जबाबदारीही महात्मा गांधी पोलिस चौकीच्या अखत्यारीत येते.
मात्र, गेल्या काही महिन्यांपासून हा परिसर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे, नशेबाज तरुणांच्या टोळ्या यामुळे दहशतीखाली आहे. लुटारु टोळ्यांचे राज्य या परिसरावर आहे. या परिसरात गेल्या दोन महिन्यात दररोज लहान-मोठय़ा लुटमारीच्या घटना घडल्या आहेत. या परिसरात असणाऱया झोपडपट्टय़ांमध्ये परप्रांतीय मोठय़ा प्रमाणात राहतात. त्यांच्यापैकीच काही हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. अशाच प्रवृत्तीच्या लोकांकडून या भागात गुन्हेगारीचा शिरकाव झाला आहे.
बस आणि रेल्वे स्टेशन परिसरात येणाऱया प्रवाशांना पहाटे आणि रात्रीच्यावेळी हत्यारांचा धाक दाखवून लुबाडणूक करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या आठवडाभरात तर या भागात लुटारुंनी प्रचंड दहशत माजवली आहे. सलग सहा दिवस प्रवासी, बस चालक यांना चोरटय़ांनी लुबाडले आहे. मिरज बस स्थानकात तर भर दिवसा प्रवाशांची गर्दी असताना चोरटय़ांनी एखाद्या चित्रपटाला शोभेल, अशा पध्दतीने बसमध्ये शिरुन बसमधील प्रवासी, चालक आणि वाहकाला हत्यारांचा धाक दाखवून प्रवाशांना लुबाडल्याची घटना घडली आहे. यावेळी सदर लुटारुने तुम्ही कोठेही तक्रार आमचे कोणी काही वाकडे करु शकत नाही, अशा पध्दतीची भाषाही केली होती. त्यावरुनच या लुटारुंचे धारिष्ठय़ दिसून येते. त्यांना पोलिसांचा आणि कायद्याचा धाक अजिबात नसल्याचे यावरुन स्पष्ट होते.
या भागात लुटारुंच्या आणि गुन्हेगारांच्या ज्या टोळ्या आहेत, त्या दिवसभर गांजा, व्हाईटनर किंवा तत्सम अंमली पदार्थांचे सेवन करुन रस्त्याकडेला सावज हेरत उभारलेले असतात. त्यांची नांवे, पत्ता हे या भागातील नागरिकांना आणि व्यावसायिकांना माहिती आहेत. मात्र, या परिसराची कायदा आणि सुव्यवस्था ज्यांच्या खांद्यावर आहे, त्या महात्मा गांधी पोलिस चौकीच्या अधिकारी आणि कर्मचाऱयांना मात्र त्याबद्दल काहीच माहिती होत नाही. लुबाडणुकीच्या घटना झाल्या तरी केवळ जुजबी कारवाई करुन आणि कमीत कमी शिक्षेची कलमे लावून लुटारुंना अभय देण्याचा प्रयत्नच पोलिसांकडून करण्यात येतो. त्यामुळेच या लुटारु टोळ्यांचे धैर्य वाढले आहे. दिवसाढवळ्या लुटमार करुन पोलिस आमचे काहीच करु शकत नाहीत, अशा पध्दतीच्या वल्गना करण्याचे धाडस पोलिसांच्या नाकर्तेपणामुळेच त्यांच्यामध्ये आले आहे.
या भागातून रात्री आणि पहाटेच्यावेळी जाणे-येणेही आता नागरिक आणि प्रवाशांना मुश्कील झाले आहे. इतकी दहशत या लुटरुंनी या भागात पसरविली आहे. गेल्या आठवडाभरात लुटमारीच्या सलग सहा घटना घडल्या आहेत. रेल्वे स्टेशनवर नेण्यासाठी आलेल्या बस चालकावर दगडफेक आणि फरशी डोक्यात घालून लुटण्याचा प्रकारही झाला आहे. मात्र, महात्मा गांधी चौकी पोलिसांना याच खबरबातही नव्हती. या परिसरात घडणाऱया अशा घटनांमुळे पोलिसांचा धाकच या गुन्हेगारांना उरला नाही, हे स्पष्टपणे निदर्शनास येते. गुन्हेगारांची एवढी दहशत आहे की, येथे महात्मा गांधी चौकी पोलिस ठाण्याचे पोलिस फिरकण्यास घाबरत असल्याचा आरोप येथील नागरिक करीत आहेत.
या भागातील नागरिकही पोलिसांच्या या सोयीस्कर दुर्लक्षाबाबत संताप व्यक्त करीत आहेत. लुटारुंच्या टोळ्यांबरोबरच याठिकाणी अंमली पदार्थांची नशा करणाऱया तरुणांमुळेही महिला प्रवासी आणि अन्य नागरिकांना येणे-जाणे मुश्कील झाले आहे. उघडपणे गांजा व अन्य अंमली पदार्थांची व्यसने करताना येथील तरुण आढळून येत आहेत. या भागात गुन्हेगारी सफाईची मोहिम पोलिसांनी राबवावी, अशी मागणी होत आहे. अन्यथा कायदा व सुव्यवस्थेच्या जबाबदारीकडे दुर्लक्ष करणारे हे पोलिस ठाणेच बरखास्त करावे, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.