वृत्तसंस्था/ लखनौ
ऑलिम्पिकमध्ये रौप्य मिळविलेली महिला वेटलिफ्टर सायखोम मिराबाई चानूला उत्तर प्रदेश सरकारने 1.50 कोटी रुपये प्रदान करीत तिचा गौरव केला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य मिळविल्याबद्दल तिला हे बक्षीस मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते देण्यात आले.
‘या सन्मानाबद्दल मी मनापासून खूप आभारी आहे. आमच्यासारख्या खेळाडूंना याआधी असा सन्मान कधीच मिळाला नव्हता, त्यामुळे हा माझ्यासाठी आयुष्यातील खूप मोलाचा क्षण आहे,’ असे मिराबाई चानू पुरस्कार स्वीकारल्यानंतर म्हणाली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये मिराबाई चानूनेच महिलांच्या 49 किलो वजन गटात रौप्य जिंकून भारताला पहिले पदक मिळवून दिले होते. या स्पर्धेत भारताने आजवरचे सर्वोत्तम प्रदर्शन करीत एकूण 7 पदके मिळविली. त्यात एक सुवर्ण, दोन रौप्य व चार कांस्यपदकांचा समावेश आहे. उत्तर प्रदेश सरकारतर्फे सुवर्ण विजेत्याला 2 कोटी, रौप्यविजेत्याला 1.5 कोटी तर कांस्यविजेत्याला 1 कोटी रुपये दिले जातात. त्यामुळे चानूला 1.5 कोटी रुपये प्रदान करण्यात आले.