कोरोनामुळे दरवाढ करून ग्राहकांची लुट
प्रतिनिधी/ सातारा
दरवर्षी उन्हाळयात वर्षभर पुरेल असे तिखट बनवण्याची लगबग सुरू असते. यंदा मात्र कोरोनामुळे संचारबंदी लागू आहे. तिखट बनवण्यासाठी मिर्ची खरेदी संथ गतीने होत असून नफा कमी झाल्याने शहरातील प्रसिद्ध मिर्ची विक्रेत्यांनी दरवाढीचा धडका सुरू केला आहे. यामुळे सर्वसामान्याच्या खिशाला फटका बसत असून यांच्यावर कारवाई करण्याची मागणी रिपाइंचे तालुकाध्यक्ष आप्पा तुपे यांनी केली आहे.
दरवर्षी प्रमाणे यंदा उन्हाळा तीव्र स्वरूपात जाणवत आहे. या उन्हाळयात गृहिणींनी उन्हाळी कामासह वर्षभर पुरेल असे तिखट करण्याचे नियोजनही केले होते. यामुळे शहरातील दुकानदारांनी सर्वच प्रकारच्या मिर्ची विक्रीसाठी आणल्या आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 24 मार्च पासून संचारबंदी लागू झाली आहे. यामुळे शहरात मिर्ची खरेदीला ग्राहक नाहीत. दुकानात पोती उभी असून खरेदी नसल्याने दुकानदारांना तोटा सहन करावा लागत आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी 501 पार्टी, शेटे चौक, मार्केट यार्ड येथील मिर्ची विक्रेत्यांनी लवगी मिर्चीचा दर 200 रूपये, 190 रूपये, 170 रूपये किलो लावला आहे. तसेच शंकेश्वरी, कश्मीरी बेडगी, यांची 250 ते 300 रूपये किलोच्या दराने विक्री होत आहे. मिर्चीचे दर ऐकूनही ग्राहकांना खरेदी करणे भाग पडत आहेत. ग्राहकांना वेठीस धरत दुकानदारांनी मनमानी कारभार सुरू केला आहे. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. या दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी तुपे यांनी केली आहे.