राष्ट्रीय महामार्ग पाधिकरण कोल्हापूर विभागाची कार्यवाही
4-5 दिवसांत बांधकामे न हटवल्यास बुलडोझर फिरणार
प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी मिऱ्या-नागपूर महामार्गावर रत्नागिरी शहरालगत साळवी स्टॉप-टीआरपी ते रत्नागिरी रेल्वेस्थानक हद्दीपर्यंत या मार्गाला खेटून मोकळ्या जागेत अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे. त्याची गंभीर दखल राष्ट्रीय महामार्ग पाधिकरण कोल्हापूर यांनी घेतली आहे. अनधिकृत बांधकामे करणाऱ्या 100 जणांना नोटीस बजावल्या आहेत. येत्या 4-5 दिवसांत केलेली बांधकामे हटवा नाहीतर त्यावर बुलडोझर फिरवण्यात येणार असल्याची सक्त ताकीद देण्यात आल्याचे प्रांताधिकारी विकास सुर्यवंशी यांनी सांगितले.
रत्नागिरी मिऱ्या-नागपूर महामार्गालगत रत्नागिरी शहरानजीकच्या साळवी स्टॉप ते एमआयडीसी मिरजोळे-टीआरपी-रेल्वेस्थानक हद्दीपर्यंत अनेक अनधिकृत बांधकामे उभी राहत आहेत. त्या अनधिकृत बांधकामांच्या बाजारपेठेला नेमका वरदहस्त कोणाचा, या बाबत चर्चेला पेव फुटले आहे. महामार्गाच्या दुपदरीकरणाचे काम सुरू झाल्यानंतर लगतच्या बाधित क्षेत्रात असलेली सर्व बांधकामे हटणार आहेत. पण शहरानजीकच्या साळवी स्टॉपपासून ते जे. के.फाईल्सपासून त्याही पुढे टीआरपी अगदी एमआयडीसी-पॉवरहाऊस कुवारबावच्या उतारापर्यंत भलतीच बांधकामे या मार्गाला खेटून उभी राहू लागली आहेत.