ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीतील नाराजी उघड झाली असतानाच आता काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान काँग्रेसकडून देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता महाविकास आघाडी सरकारने करावी, अशी मागणी करणारे पत्र काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी केली आहे.
या पत्रात मिलिंद देवरा यांनी म्हटलं आहे की, सर्वप्रथम आपले आभार मानतो कारण काँग्रेसशासित राज्यांमध्ये पक्षाने लोकांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे सरकारला लोकांचा विश्वास आणि पारदर्शक कारभार पुढे नेण्यासाठी मदत होईल.
महाविकास आघाडी राज्यात चांगले काम करीत आहे. मात्र काँग्रेसकडून आश्वासनांची पूर्तता लवकर करण्यात यावी. केंद्रात काँग्रेसची सत्ता न आल्यामुळे लोकसभेला दिलेल्या आश्वासनाला ब्रेक लागला होता. परंतु राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेसचा सहभाग असल्याने या आश्वासनांची पूर्तता करण्याची वेळ आली आहे, असे मिलिंद देवरा म्हणाले.