मेरा रेकॉर्ड तोडनेवाला इंडिया मे पैदा नही हुआ’, असे छातीठोकपणाने सांगणारे स्वतंत्र भारताचे सर्वोत्तम क्रीडापटू मिल्खा सिंग यांचे शुक्रवारी रात्री उशिरा आजाराशी झुंजताना निधन झाले आणि फ्लाईंग सिंगची ही एक्झिट अवघ्या देशाला चटका लावून गेली. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत 80 पैकी 77 इव्हेंट जिंकणारे मिल्खा अवघ्या क्रीडा जगतासाठी खरेखुरे प्रेरणास्थान होते. रोम ऑलिम्पिकमध्ये अवघ्या 0.01 फरकाने कांस्यपदकाने हुलकावणी दिली, हे मिल्खा यांचे दुर्दैव. पण, याच शर्यतीने त्यांना कदाचित अजरामरही केले. अगदी बूट पॉलिशपासून पडेल ती सर्व कामे करत, लष्करात दाखल होत, रोम ऑलिम्पिकपर्यंतचा त्यांचा प्रवास अर्थातच थक्क करणारा, नवी प्रेरणा देणारा आहे. मिल्खा यांच्या एका विजयानंतर पाकिस्तानचे तत्कालीन सर्वेसर्वा अयूब खान उत्स्फूर्तपणे म्हणाले होते, मिल्खा बस दौडता नही, उडता है!
संघर्षात घडले, संघर्षातच वाढले!
मिल्खा सिंग यांचा जन्म पंजाब प्रांतात दि. 20 नोव्हेंबर 1929 रोजी सिख राठोड परिवारात झाला. मिल्खा यांच्यासह एकूण 15 अपत्यांचा हा मोठा परिवार. पण, मिल्खा यांचे अनेक भाऊ-बहिणी अकालीच दगावले. फाळणीनंतर झालेल्या दंग्यांमध्ये मिल्खाला आपले आई-वडिल व काही भावंडांना गमवावे लागले. शेवटी ते शरणार्थी बनत रेल्वे पाकिस्तानातून दिल्लीत आले. दिल्लीत काही दिवस आपल्या विवाहित बहिणीच्या घरी राहिले, काही दिवस निर्वासितांच्या शिबिरात राहून काढले व काही दिवस असेच इकडे-तिकडे फिरत राहिले.
हा भयंकर आघात सहन केल्यानंतर ते तावून सुलाखून बाहेर पडले होते. भाऊ मलखानने सांगितल्याप्रमाणे नंतर त्यांनी लष्करात दाखल होण्याचा निर्णय घेतला आणि 1951 साली चौथ्या प्रयत्नात त्यांना यात यश मिळाले. लहानपणी घर ते शाळा व शाळा ते घर असे 10 किलोमीटर्सचे अंतर ते धावून पूर्ण करायचे आणि याचा लाभ होत लष्करी चाचणीत आयोजित शर्यतीत ते सहाव्या स्थानी आले. नंतर त्यांना खेळात विशेष प्रशिक्षणासाठी लष्करात संधी मिळाली.
1959 मध्ये पद्मश्री, अर्जुन पुरस्कार स्वीकारण्यास मात्र नकार!
1958 मध्ये आशियाई स्पर्धेतील यशानंतर लष्कराने मिल्खा सिंग यांना ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर म्हणून बढती दिली आणि नंतर पंजाब सरकारने त्यांना क्रीडा निर्देशक पदावर नियुक्त केले. मिल्खा 1998 मध्ये याच पदावरुन निवृत्त झाले. 1959 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले गेले. 2001 मध्ये मात्र त्यांनी अर्जुन पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला.
मिल्खाप्रमाणेच जीव मिल्खाही पद्मश्रीचे मानकरी
1956 मेलबर्न ऑलिम्पिकदरम्यान मिल्खा एका ऑस्ट्रेलियन युवतीच्या प्रेमात पडले होते. त्या युवतीचे नाव होते बेट्टी कथबर्ट. अर्थात, नंतर मिल्खा यांनी निर्मला कौर यांच्याशी विवाह केला. निर्मला कौर या त्यावेळी भारतीय व्हॉलीबॉल संघात समाविष्ट होत्या. 1962 मध्ये हे दोघे विवाहबंधनात अडकले. मिल्खा दाम्पत्याच्या पश्चात 3 कन्या व 1 चिरंजीव असा परिवार. मिल्खा यांचा चिरंजीव जीव मिल्खा सिंग हा आघाडीचा गोल्फपटू. मिल्खा यांच्याप्रमाणेच जीव मिल्खा सिंग देखील पद्मश्री पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
चित्रपटासाठी निर्मात्याकडून घेतला केवळ एक रुपया!
आपल्या आयुष्यावर पडद्यावर जीवनपट साकारण्यासाठी मिल्खा सिंग यांनी चित्रपट निर्माते राकेश ओम प्रकाश यांच्याकडून अतिशय नाममात्र मानधन घेतले आणि ते मानधन होते केवळ एक रुपया! या एक रुपयाच्या नोटेची खासियत अशी होती की, ती नोट 1958 सालातील होती. याच सालात मिल्खा यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत भारताकरिता प्रथमच सुवर्ण जिंकून दिले होते.
त्यांनी नेहरुंकडे मागितली, पूर्ण देशाकरिता एका दिवसाची सुट्टी!
1958 मध्ये सुवर्ण जिंकल्यानंतर पूर्ण देशभरात केवळ मिल्खा यांच्या नावाची लहर आली. मिल्खानी त्यावेळी तत्कालीन विश्वविक्रमधारक माल्कम स्पेन्सला धूळ चारली होती. इंग्लंडच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी मिल्खा यांना सुवर्ण प्रदान केले, त्यावेळी तिरंगा दिमाखात झळकला आणि मिल्खा यांना अर्थातच आनंदाश्रू अनावर झाले.
नंतर काही क्षणातच ब्रिटनमधील भारताच्या राजदूत विजयालक्ष्मी पंडित या मिल्खा सिंगना भेटल्या आणि त्यांनी सांगितले, ‘पंडित जवाहरलाल नेहरु यांनी आपले अभिनंदन केले आहे. शिवाय, आपल्याला याचे इनाम म्हणून काय हवे आहे, असे विचारले आहे’.
आनंदात बेभान मिल्खा यांना त्यावेळी काहीच सूचत नव्हते. तरीही ते सहज बोलून गेले, ‘पूर्ण भारत देशात एका दिवसाची सुट्टी जाहीर करा’!
आश्चर्य म्हणजे मिल्खा ज्या दिवशी भारतात पोहोचले, त्याच दिवशी नेहरु यांनी शब्द पाळला आणि पूर्ण देशाला एका दिवसाची सुट्टी जाहीर केली!
पाकिस्तानात मिळाली ‘फ्लाईंग सिख’ पदवी
1960 मध्ये मिल्खा सिंग यांनी पाकिस्तानी भूमीत आयोजित आंतरराष्ट्रीय ऍथलिट स्पर्धेत भाग घेण्यास नकार दिला होता आणि यासाठी फाळणी होण्यापूर्वी ज्या यातना भोगाव्या लागल्या, त्याचा विसर पडला नव्हता, हे मुख्य कारण होते. मात्र, नंतर नेहरु यांनी मिल्खा यांची समजूत काढली व मिल्खा सहभागी झाले अन् अब्दुल खारिक यांना हरवत त्यांनी नवा इतिहास रचला. या विजयानंतर पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती फिल्ड मार्शल अयूब खान यांनी मिल्खा सिंगना फ्लाईंग सिख ही पदवी दिली.
मागे वळून पाहिले अन् तिथेच घात झाला!
तसे पाहता मिल्खा सिंग यांनी आशियाई स्पर्धेत 4 सुवर्ण व राष्ट्रकुल स्पर्धेत 1 सुवर्ण जिंकले आहे. पण, ज्या-ज्यावेळी मिल्खा यांचे नाव येते, त्यावेळी त्यांच्या विजयापेक्षा त्यांच्या पराभवाचे किस्सेच अधिक चर्चेत येतात आणि यात सर्वाधिक आघाडीवर, रोम ऑलिम्पिक स्पर्धेत मिल्खा चौथ्या स्थानी फेकले गेले, तो किस्सा!
वास्तविक, ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधव, लियांडर पेस, राजवर्धन सिंग राठोड, अभिनव बिंद्रा अशा अनेक दिग्गजांनी वैयक्तिक पदके जिंकून दिली आहेत. मात्र, रोम ऑलिम्पिकमध्ये मिल्खा यांचे हमखास मिळू शकणारे पदक हुकले, याची चर्चा आजवर अधिक झडत आली आहे.
रोमला जाण्यापूर्वी दोन वर्षांआधीच मिल्खा जागतिक स्तरावरील ऍथलिट म्हणून वाखाणले गेले. कार्डिफ राष्ट्रकुल स्पर्धेत तत्कालीन विश्वविक्रमवीर स्पेन्सला हरवत सुवर्ण जिंकले, त्यावेळी अवघ्या जागतिक क्रीडा विश्वाचे त्यांनी लक्ष वेधून घेतले होते. प्रत्यक्ष ऑलिम्पिकमध्ये भारताचे ऍथलेटिक्स प्रशिक्षक वेन्स रील यांनी मिल्खा हमखास पदक जिंकतील, असा ठाम विश्वास व्यक्त केला होता.
मिल्खा सुवर्ण जिंकू शकतील, असाही वेन्स यांचा अंदाज होता. याचे कारण असे की, रोम ऑलिम्पिकपूर्वी 80 स्पर्धांमध्ये भाग घेत मिल्खा यांनी तब्बल 77 शर्यती जिंकल्या होत्या. त्यामुळे, रोममध्ये 400 मीटर्सची स्पर्धा कोण जिंकणार असेल तर ते भारताचे मिल्खाच असतील, इतकी चर्चा त्यावेळी रंगली होती.
त्यानंतर रोममध्ये मिल्खा सिंग पाचव्या हिटमध्ये दुसऱया स्थानी राहिले. उपांत्यपूर्व व उपांत्य फेरीतही ते दुसऱया स्थानी आले. चाहत्यांचे मोठे समर्थन त्यांना लाभत होते. बीबीसीच्या प्रतिनिधीशी बोलताना मिल्खा म्हणाले होते, मी दाखल होताच चाहते स्टेडियम अक्षरशः डोक्यावर उचलून घेत असत. लोक म्हणायचे की, हा साधू आहे. कारण, त्यापूर्वी त्यांनी सरदार कधी पाहिलाच नव्हता.
फायनलच्या दिवशी….
एरवी, ऑलिम्पिकमध्ये सेमी फायनल झाल्यानंतर दुसऱयाच दिवशी फायनल होत असते. मात्र, रोम ऑलिम्पिकमध्ये सेमी फायनल झाल्यानंतर दोन दिवसांचे अंतर होते आणि त्यानंतर फायनल होती. या दोन दिवसाच्या अंतराचा विपरीत परिणाम असा झाला की, मिल्खा यांना विचार करण्यास बराच अवधी मिळाला आणि स्वतःच त्यांनी दडपण वाढवून घेतले.
प्रत्यक्ष स्पर्धेत कार्ल कॉफमनला पहिली लेन मिळाली. अमेरिकेचे ओटिस डेव्हिस दुसऱया लेनमध्ये होते. दुर्दैवाने मिल्खा यांच्या पाचव्या लेनशेजारी स्पर्धेतील सर्वात कमकुवत जर्मन ऍथलिट होता, ज्याला मिल्खा यांनी सातत्याने हरवले होते आणि मिल्खा यांचे यामुळे या फायनलचे सर्व आडाखेच चुकले.
मिल्खा या आठवणीला उजाळा देताना म्हणाले होते, ‘400 मीटर्सच्या त्या इव्हेंटमध्ये जवळपास 250 मीटर्सपर्यंत मी आघाडीवर होतो. असाच वेग कायम राखला तर कदाचित ही शर्यत आपण पूर्ण करु शकणार नाही, असे वाटल्याने मी थोडा वेग कमी केला. शेवटचे जवळपास 100 मीटर्स बाकी असताना मी त्यावेळी किंचीत मागे वळून पाहण्याची चूक केली आणि अचानक माझ्या जवळचे तीन-एक स्पर्धक पुढे निघून गेले. ते 3-4 पावलांचे अंतर भरुन काढले. पण, तोवर व्हायचे ते नुकसान होऊन गेले होते. मागे वळून पाहण्याच्या त्या चुकीमुळेच माझे व भारताचे एक पदक पाहता पाहता नजरेसमोर हिरावून नेले गेले’!