होणार होणार म्हणून तब्बल 90 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर करिअरच्यादृष्टीने महत्त्वाची मानली जाणारी व उज्ज्वल भवितव्याची दिशा देणारी दहावीची परीक्षा शुक्रवारी संपली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा होणार की नाही, या संभ्रमावस्थेत असताना अखेर तृतीय भाषेच्या पेपरने दहावी परीक्षेची शुक्रवारी सांगता झाली आणि विद्यार्थ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
दि. 25 जूनपासून सुरू झालेली दहावीची परीक्षा 3 जुलै रोजी संपली. त्यामुळे कोविड-19 च्या संकटात सुरू झालेले मिशन एसएसएलसी फत्ते झाले. दहावीची परीक्षा संपली तरी आता विद्यार्थ्यांची नजर निकालाकडे लागली आहे.
2019-20 या शैक्षणिक वर्षात दहावीची परीक्षा कोरोना व लॉकडाऊनमुळे लांबणीवर पडली होती. परिणामी 27 मार्च ते 9 एप्रिल दरम्यान होणाऱया परीक्षेला 25 जून रोजी मुहूर्त लागला. तीन महिन्यांच्या कालावधीनंतर परीक्षा झाल्याने विद्यार्थीवर्गाबरोबरच पालकवर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
बेळगाव जिल्हय़ात तृतीय भाषेचा पेपर देणाऱयांची एकूण संख्या 31,977 इतकी होती. यापैकी 31,204 विद्यार्थी उपस्थित होते तर 773 परीक्षार्थी गैरहजर होते. पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत विद्यार्थ्यांची थर्मल स्क्रिनिंग, मास्क, सॅनिटायझर ही सर्व आरोग्यविषयक काळजी घेण्यास परीक्षा केंद्रांमध्ये प्राधान्य देण्यात आले. त्याचप्रमाणे विद्यार्थी परीक्षा केंद्रांबाहेर पडतानादेखील आरोग्य कर्मचारी, शिक्षक व इतर सदस्यांनी शेवटच्या पेपर दिवशीही विद्यार्थ्यांची योग्य ती काळजी घेतली. त्यामुळे पालकवर्गातून समाधान व्यक्त होत होते. परीक्षार्थी केंद्राबाहेर पडताच सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळाले असले तरीदेखील या आनंदोत्सवाच्या भरात त्यांनी सामाजिक अंतराचा फज्जा उडविल्याचे चित्र दिसून आले.
परीक्षा संपल्याचा विद्यार्थ्यांच्या चेहऱयावर आनंद
परीक्षा संपल्याच्या आनंदात बरेच विद्यार्थी एकमेकांवर रंगांची उधळण करतात. पण यावषी कोरोनामुळे कोणत्याही विद्यार्थ्याने अशा प्रकारचा जल्लोष केला नाही. पण परीक्षा संपल्याचा आनंद प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱयावर दिसून येत होता. त्यामुळे परीक्षा केंद्र परिसर विद्यार्थ्यांच्या गलबलाटाने आणि उत्साहाने फुलून गेला होता. तणावरहीत चेहरे आणि पुढील वाटचालीची स्वप्ने डोळय़ांमध्ये साठवत सर्व विद्यार्थी केंद्राबाहेर पडले व सुटकेचा नि:श्वास सोडला.