ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाब विधानसभा निवडणुकीची तयारी आम आदमी पक्षाने देखील सुरु केली आहे. पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी चंदीगड भेटीदरम्यान, मोठ्या घोषणा केल्या आहेत.
पत्रकार परिषदेमध्ये केजरीवाल यांनी वचन दिले की, पंजाबमध्ये निवडणूक जिंकल्यानंतर प्रत्येक पंजाबी नागरिकांना 300 युनिट पर्यंत मोफत वीज देण्यात येईल. या शिवाय पंजाबमधील सर्व जुनी थकीत बिले रद्द केली जाणार असल्याची घोषणा केली आहे. यासोबतच दिल्ली प्रमाणेच पंजाबमध्ये देखील 24 तास वीज दिली जाईल, असे देखील संगितले आहे. यावेळी केजरीवाल यांनी पंजाबमध्ये दिल्ली मॉडेल प्रमाणे काम केले जाणार असल्याचे म्हटले आहे.
पुढे ते म्हणाले, आपचे सरकार सत्तेत येताच हा निर्णय घेतला जाईल. वीज उत्पादक राज्य असूनही संपूर्ण देशात सर्वात महागडी वीज पंजाबमध्ये पुरवली जात आहे. वीज कंपन्या आणि सत्ताधाऱ्यांतील कथित संबंध तोडल्यास पंजाबमध्ये वीजेचे दर सर्वात कमी असतील. ज्यांची वीज कापण्यात आलेली आहे, त्यांना वीज कनेक्शन दिले जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, यापूर्वीच केजरीवाल यांनी पंजाबच्या नागरिकांना सांगितले आहे की, पंजाबमध्ये जेव्हा आप सरकार येईल त्यावेळी आम्ही बरगाडी कांडमधील दोषींना शिक्षा देऊन पंजाबच्या नागरिकांना न्याय मिळवून देऊ.
पुढे ते म्हणाले होते की, पंजाब सध्या खराब परिस्थितीतून जात आहे. जेव्हा पूर्ण पंजाब संकटात होता तेव्हा सत्ताधारी पार्टीचे नेते खुर्चीसाठी भांडत होते, त्यामुळे पंजाबमधील जनतेला बदल पाहिजे आहे आणि सद्य स्थितीत आम आदमी पक्ष हीच त्याच्यासमोर उम्मिद आहे, असेही त्यांनी म्हटले होते.