अध्यक्षपदाच्या लढतीत टाटा विजयी – ‘एनसीएलएटी’चा निर्णय रद्द
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
टाटा सन्स आणि सायरस मिस्त्री प्रकरणी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल दिला. अध्यक्षपदाच्या लढतीत उद्योगपती रतन टाटा हे विजयी झाले आहेत. टाटा समूहाच्या अध्यक्षपदावर सायरस मिस्त्री राहू शकत नाहीत असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने रतन टाटा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या प्रकरणी निकाल दिल्यानंतर सायरस मिस्त्री यांना मोठा धक्का बसला आहे. तसेच टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून गेली पाच वर्षे सुरू असलेल्या वादावर आता सर्वोच्च न्यायालयाने पडदा टाकला आहे.
टाटा सन्स लिमिटेड ही टाटा समूहाची कंपनी आणि शापूरजी पालनजी ग्रुपचे सायरस मिस्त्री यांच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. या निकालानुसार सर्वोच्च न्यायालयाने टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांना हटवण्याचे औचित्य सिद्ध केले आहे. त्याचबरोबर, टाटा आणि मिस्त्री या दोन्ही समूहानी एकत्रितपणे हा वाद सोडवावा, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि सायरस इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेडने नॅशनल कंपनी लॉ अपील न्यायाधिकरणच्या (एनसीएलएटी) निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्यात आली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. मुख्य न्यायमूर्ती एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती ए. एस. बोपण्णा आणि व्ही. रामसुब्रम्हण्यम यांच्या खंडपीठाने हा निर्णय सुनावला आहे. ‘एनसीएलएटी’ने आपल्या आदेशानुसार, 100 अरब डॉलर्सच्या टाटा समूहाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून सायरस मिस्त्री यांना पुन्हा नियुक्त केले होते.
पाच वर्षापूर्वी 2016 साली, सायरस मिस्त्री यांना टाटा समूहाच्या चेअरमन पदावरून काढण्यात आले होते. त्याविरोधात सायरस मिस्त्री यांनी कायदेशीर प्रक्रियेच्या माध्यमातून त्याला आव्हान दिले होते. डिसेंबर 2019 मध्ये ‘एनसीएलएटी’ने मिस्त्रींना अशा पद्धतीने पदावरून काढण्याच्या निर्णयाला चुकीचे ठरवले होते. ते पद त्यांना परत देण्यात यावे, असेही सांगितले होते. टाटा ग्रुपनेही या विरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. जानेवारी 2020 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ‘एनसीएलएटी’च्या आदेशाला स्थगिती दिली होती. त्यानंतर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने ‘एनसीएलएटी’चा निर्णय रद्द ठरवला आहे.
मूल्ये-नैतिकतेचे प्रमाणिकरण सिद्ध – रतन टाटा
रतन टाटा यांनी ट्विट करत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर केला आहे. तथापि, हा विजय किंवा पराभवाचा मुद्दा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “माझ्या अखंडतेवर आणि ग्रुपच्या नैतिक आचरणावर सतत कठोर हल्ले झाल्यानंतर टाटा सन्सच्या सर्व मागण्यांना मान्यता देणारा निकाल हा या ग्रुपचे नेहमीच मार्गदर्शक तत्त्व राहिलेल्या मूल्ये आणि नैतिकता यांचे प्रमाणीकरण आहे,’’ असे रतन टाटा यांनी म्हटले आहे.