मुंबई \ ऑनलाईन टीम
सत्ताधाऱ्यांमध्ये सारंकाही आलबेल नसल्याच्या मुद्द्यावरून भाजपाकडून सातत्याने सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं जात असताना आता संजय राऊतांनी त्यावर प्रत्युत्तर दिलं आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व काही आलबेल असल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मतभेद असू शकतात. मात्र त्याचा अर्थ नाराजी आहे असा होत नाही. दोन वर्षांत तिन्ही पक्षांनी सरकार चालवताना उत्तम काम केलं आहे. तिन्ही पक्षांमध्ये उत्तम समन्वय आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली महाविकास आघाडी सरकार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला
.
संजय राऊत म्हणाले की, सरकार एक पक्षाचं असो, दोन पक्षाचं असो, महाविकास आघाडीचं असो किंवा अटलजींसारखं ३२ पक्षांचं असो. मनुष्य म्हटला की कामाच्या पद्धतीवरून लोकांमध्ये मतभेद असू शकतो. याचा अर्थ कुणी नाराज आहे असा होत नाही. कॅबिनेटमध्ये एखाद्या विषयावर दुसरं मत असू शकतं. म्हणून ती कॅबिनेटची बैठक बोलावली जाते. त्यातून निर्णय घेतला जातो. हा जो बाहेर नाराजीचा धूर सोडला जातोय , त्यात अर्थ नाही. हे धुकं आहे. ते आता खाली बसलं आहे.सरकारमध्ये नाराज कुणीच नाही. विरोधी पक्षाला हवं आहे तसं काही घडत नाही. त्यामुळे त्यांचा नाराज शब्दावर जास्त जोर आहे. त्यामुळे सगळा आनंदच आहे.
कोरोनाचं संकट नसतं तर मुख्यमंत्र्यांनी योजलेल्या अनेक योजना पुढे नेता आल्या असत्या. पण आता हळूहळू कामाला आणि सरकारला गती मिळते आहे. मी ठामपणे सांगू शकतो की सध्याचं सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालीच हे सरकार चालेल, असं देखील संजय राऊत यावेळी म्हणाले.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ईडी चौकशीवरुन संजय राऊत यांनी संतप्त सवाल केले. तसंच, अनिल देशमुख यांच्याविषयी मुख्यमंत्र्यांशी बोललो. अनिल देशमुख यांची एक बाजू आहे. ती समजून घेतली पाहिजे. त्यातले बरेच विषय मी सुद्धा समजून घेतले आहेत. प्रताप सरनाईक यांचीही बाजू समजून घेतली पाहिजे. त्यांच्यावर आरोप लावून ईडी किंवा केंद्रीय तपास यंत्रणा त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रकारचे आरोप भापपाच्या लोकांवर कधी झाले नाहीत का? तिथे सगळे धुतल्या तांदळाप्रमाणे आहेत का? ते सगळे हरिश्चंद्राचे अवतार आहेत का? बाकी सगळे हरामखोर आहेत का याचा राज्यातल्या ११ कोटी जनतेनं विचार करण्याची वेळ आली आहे. लवकरच त्यासंदर्भात मुख्यमंत्री, शरद पवार, काँग्रेसचे नेते एकत्र बसून पुढील पावलं टाकतील असं दिसतंय, असं संजय राऊत म्हणाले.
Previous Articleमहाराष्ट्र : यंदाच्या गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.