नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींचे उद्गार भाजपकडून खिल्ली
नंदीग्राम / वृत्तसंस्था
आगामी पाच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकांमधील सर्वात लक्ष्यवेधी संघर्ष पश्चिम बंगालच्या नंदीग्राम मतदारसंघात होत आहे. कारण या येथे राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि एकेकाळचे त्यांचेच उजवे हात मानले गेलेले आणि आता भाजपवासी झालेले सुवेंदू अधिकारी यांच्यात चुरस आहे. राज्याचा एकंदर कल पाहता आता ममता बॅनर्जींनाही हिंदुत्वाची कास धरावी लागत आहे. त्यामुळे त्यांनी येथील प्रचारसभेत आपण ब्राम्हण आणि हिंदू असल्याची ग्वाही दिली.
मी ब्राम्हण आहे. मला मंत्रही येतात. भाजपने मला हिंदुत्व शिकवू नये. येथे हिंदू-मुस्लीम असा भेदभाव निर्माण केल्यास मी स्वस्थ बसणार नाही, असे वक्तव्य त्यांनी केले. त्यांनी काही मंत्रांचा उच्चारही सभेत केला. आपले प्रतिस्पर्धी सुवेंदू अधिकारी यांना त्यांनी आव्हान दिले. मात्र, भाजपने त्यांच्या या हिंदुत्वाच्या साक्षात्काराची ‘निवडणुकीतली नौटंका’r अशा शब्दांमध्ये खिल्ली उडविली आहे.
आत्ता आठवण आली…
ममता बॅनर्जी मनातून हादरल्या आहेत. इतकी वर्षे त्यांनी मुस्लीमांचे तुष्टीकरण केले. त्यावेळी हिंदुत्वाची आठवण झाली नाही. आता निवडणुकीत मते हिंदूंची मते हवी आहेत. त्यामुळे आपण ब्राम्हण आणि हिंदू असल्याचे त्यांना जाणवू लागले. हा राजकीय स्टंट आहे. नंदीग्रामसह राज्यात सर्वत्र भाजपमय वातावरण आहे. त्यामुळे ममता बॅनर्जींच्या पायाखालील वाळू सरकू लागली असून निराशेपाटी असे उद्गार त्यांच्या तोंडून बाहेर पडत आहेत, अशा खोचक शब्दांमध्ये राज्यातील भाजप नेत्यांनी त्यांची खिल्ली उडविली. आपण कोण आहोत, हे त्यांना 2 मे या निवडणूक परिणामांच्या दिवशी समजेल असाही टोला भाजपने लगावला.