ऑनलाईन टीम / औरंगाबाद :
मी भाजप सोडणार या अफवांवर विश्वास ठेवू नका असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. त्या म्हणाल्या, नव्या सरकारकडून चांगल्या अपेक्षा आहेत. मी 100 दिवसात काही त्यांच्यावर टीका करणार नाही असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. मी मराठवाडय़ात समाजसेविका म्हणून काम करणार असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या बॅनरखाली पंकजा मुंडे यांनी आज मराठवाडय़ाच्या पाणीप्रश्नावर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.
हे उपोषण सत्तेच्या विरोधात नसल्याचं त्यांनी यावेळी जाहीर केलं आहे. मराठवाडय़ाच्या पाणीप्रश्नाकडे सरकारचं लक्ष जावं म्हणून हे उपोषण करत असल्याच्या पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे. तसेच हे उपोषण सत्तेच्या विरोधात नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
मराठवाडय़ातल्या शेतकऱयांचे आणि तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. ठाकरे सरकारने इथला प्राणी प्रश्न सोडवला पाहिजे. तसंच आमच्यापेक्षा चांगलं काम करुन दाखवा असंही आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं आहे.
या उपोषणाला त्यांच्या खासदार भगिनी प्रीतम मुंडेही हजर होत्या. तर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि विधन परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सहभागी झाले होते.