माजी राजदूतांच्या प्रश्नांना राहुल गांधींनी दिली उत्तरे
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
जर मी पंतप्रधान असतो तर विकासकेंद्रीत धोरणांऐवजी रोजगार निर्मितीवर अधिक भर दिला असता असे उद्गार काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेचे माजी राजदूत निकोलस बर्न्स यांच्यासोबतच्या ऑनलाईन चर्चेवेळी काढले आहेत. पंतप्रधानपदी निवड झाली असती तर काय केले असते अशी विचारणा त्यांना करण्यात आली होती. विकासकेंद्रीत विचाराला रोजगार निर्मितीच्या दिशेने वळविले असते. आम्हाला विकासाची गरज आहे, पण आम्ही उत्पादन वाढविणे आणि रोजगारनिर्मिती तसेच मूल्यवर्धनासाठी सर्वकाही करू असे राहुल यांनी म्हटले आहे.
विकास आणि रोजगारनिर्मिती, मूल्यवर्धन तसेच उत्पादनादरम्यान जसे संबंध असावेत तसेच आमच्या देशात नाहीत. मूल्यवर्धनामध्ये चीन आघाडीवर आहे. रोजगारनिर्मितीची समस्या असल्याचे सांगणाऱया एकाही चिनी नेत्याला भेटलो नसल्याचे राहुल म्हणाले.
लॉकडाउनच्या प्रारंभी शक्तीचे विकेंद्रीकरण करण्यात यावे असे मी म्हटले होते. पण काही महिन्यांनी हे केंद्र सरकारला उमगले, तोपर्यंत नुकसान घडून गेले होते. अर्थव्यवस्थेला वेग देण्यासाटी लोकांच्या हातात पैसे देणे हा एकच मार्ग आहे. याकरता आमच्याकडे ‘न्याय’चा विचार असल्याचे राहुल यांनी अर्थव्यवस्थेशी संबंधित एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले आहेत.
सत्तारुढांनी भारताच्या संघटनात्मक संरचनेवर ‘पूर्णपणे कब्जा’ केला आहे. 2014 पूर्वी या तत्वांवर आम्ही काम करायचो, त्यात आता बदल झाला आहे. निष्पक्ष राजकीय लढाईचे समर्थन करण्याची अपेक्षा असलेल्या संस्थांकडून आता तसे होत नसल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे. महत्त्वाच्या संस्थांच्या अपयशामुळे लोकांना जनआंदोलन करावे लागत आहे. शेतकरी आंदोलन याचेच उदाहरण असल्याचा दावा राहुल यांनी केला आहे.
अमेरिकेचे मौन
अमेरिकेचे प्रशासन भारतातील घडामोडींवर काहीच बोलत नाही. भारतात काय घडतेय यावर अमेरिकेच्या प्रशासनाकडून प्रतिक्रियाच येत नाही. अमेरिकेच्या राज्यघटनेत स्वातंत्र्याचा विचार समाविष्ट आहे, तो अत्यंत शक्तिशाली विचार आहे. अमेरिकेच्या या विचाराचा बचाव करावा लागणार असल्याचे राहुल यांनी बर्न्स यांच्याशी बोलताना म्हटले आहे.