फोंडय़ाचे आमदार रवी नाईक यांचे संकेत : कुठला पक्ष हे महत्त्वाचे नाही
प्रतिनिधी / फोंडा
येणारी विधानसभा निवडणूक आपण निश्चितपणे लढविणार असून ती मडकई मतदार संघातूनही लढवू शकतो. कुठल्या पक्षाच्या तिकिटावर लढणार, याला फारसे महत्त्व नाही. आजवर आपण केलेला विकास व जनतेची सेवा याच मुद्दय़ावर आपण निवडणुकीला सामोरा जाणार आहे, असे संकेत फोंडय़ाचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी दिले आहेत. काल बुधवारी फर्मागुडी येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मडकई मतदारसंघाचा आमदार व त्याच कार्यकाळात मुख्यमंत्री असताना आपण केलेली विकासकामे तेथील जनता विसरलेली नाही. मडकईत अनेक विकासाचे प्रकल्प आपण मुख्यमंत्री असताना उभारले. काही लोकांनी या प्रकल्पांच्या पाटय़ांवरील आपले नाव पुसून टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथील असंख्य चाहत्यांकडून आपण पुन्हा एकदा मडकईतून उमेदवारी करावी, असा वाढता आग्रह आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपण सक्रिय राजकारणात आहे. जनमत कौलापासून भूमिपुत्रांच्या हक्कासाठी अनेक आंदोलनात भाग घेतला. कुळ मुंडकारांना जमीन हक्क मिळावा यासाठी संपूर्ण गोव्यात जागृती केली. लोकप्रतिनिधी म्हणून हीच आपली खरी ताकद आहे. त्यामुळे एखाद्या पक्षाचा आधार घेण्यापेक्षा स्वबळावर निवडणूक लढण्यास आपण समर्थ आहे. प्रियोळ सोडून आपण मडकई किंवा अन्य कुठल्याही मतदारसंघात जनतेकडून कौल मागू शकतो, असे रवी नाईक यांनी सांगितले.
उत्तर गोव्याचा खासदार असताना आपण अवघ्या तेरा महिन्यांच्या कार्यकाळात 58 रुग्णवाहिका व शववाहिका पंचायती व अन्य संस्थांना उपलब्ध करुन दिल्या. त्यानंतर अन्य खासदारांनी हीच योजना पुढे नेली.
महसूल निर्मितीसाठी जनतेवर करांचा बोजा लादू नका
कोरोना महामारीमुळे राज्याची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. महसूल निर्मितीचे बहुतेक मार्ग बंद झाले आहेत. या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी केंद्र सरकारकडून दीर्घ काळासाठी रु. 50 हजार कोटींचा निधी मागवून छोटय़ा मोठय़ा उद्योगांना चालना देण्याची गरज आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारने तज्ञांची समिती नियुक्त करुन तीन महिन्यांत अहवाल मागवावा. प्रत्येक गोष्टीसाठी जनतेवर करांचा बोजा लादण्यापेक्षा महसूलवाढीचे नवीन मार्ग शोधण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. कोरोनामुळे हजारो लोकांचे रोजगार बुडाले आहेत. जनता अडचणित असताना, त्यांच्यावर करांचा अतिरिक्त भुर्दंड लादू नका, असे नाईक म्हणाले.
टॅक्सीवाल्यांना मिटरची सक्ती करणे योग्य नाही
राज्यातील टुरिस्ट टॅक्सीवाल्यांच्या प्रश्नावर बोलताना, त्यांना सध्यस्थितीत मिटरची सक्ती करणे योग्य होणार नाही. लॉकडाऊनमुळे त्यांचा व्यवसाय आधीच अडचणीत आहे. एखादे भाडे मिळाल्यास परतीच्यावेळी प्रवासी मिळतीलच, याची शाश्वती नसते. मुंबईसारखी झटपट प्रवासी मिळण्याची सोय गोव्यात नाही. त्यामुळे सरकारने टॅक्सीचालकांचे प्रश्न आधी समजून घ्यावेत व नंतरच मिटरची सक्ती करावी.
फोंडय़ातील खराब रस्त्यांना आजी माजी बांधकाममंत्री जबाबदार
फोंडय़ातील खराब रस्त्यांना विद्यमान व माजी बांधकाममंत्री जबाबदार असल्याचा आरोप रवी नाईक यांनी केला. कुठलेही नियोजन व भूसर्वेक्षण न करतानाच मलनिस्सारण प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. तीन वर्षांत पूर्ण व्हायचा हा प्रकल्प सहा वर्षे झाली तरी पूर्ण होत नाही. या प्रकल्पामुळे रस्त्यांचे काम अडले आहे. मलनिस्सारण प्रकल्पाच्या पाईप्स खरेदीमध्ये मोठा घोटाळा असून त्याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.
मगोचे फोंडय़ातील नेते डॉ. केतन भाटीकर यांनी खडपाबांधच्या रस्त्यावरुन केलेल्या टिकेला उत्तर देताना, काही लोक आपली पात्रता सोडून प्रसिद्धीसाठी कुणावरही टीका करीत आहेत, असे रवी नाईक म्हणाले.
फोंडय़ातील क्रांती मैदानाची अर्धी जागा अजूनही सैन्य दलाच्या ताब्यात आहे. आपण मुख्यमंत्री असताना क्रांती मैदानासाठी अर्धी जागा ताब्यात घेतली होती. सैनिकी प्रशिक्षण केंद्राला दुसऱया ठिकाणी तेवढीच जागा देऊन क्रांती मैदानाच्या विस्तारासाठी उर्वरीत जागा फोंडा पालिकेच्या ताब्यात येऊ शकते. त्यासाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी प्रयत्न करावेत. स्व. मनोहर पर्रीकर हे संरक्षणमंत्री असताना हे शक्य होते, असे रवी नाईक यांनी सांगितले.