प्रतिनिधी / दहिवडी :
मला माझ्या मतदारसंघाचा विकास करायची, पाणीयोजना पूर्ण करायची मस्ती आहेच. मी माणचे नव्हे तर शरद पवारांचे राजकारण नासवलंय हे जिल्ह्याला माहित आहे. पवारांचा सच्चा सैनिक म्हणविणारे प्रभाकर देशमुख भाजपमध्ये घ्या म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या हातापाया पडत होते. पवारांनी कायम सहकार्य केलेले देशमुख निवृत्तीनंतर पवारांचाच कार्यक्रम करायला निघाले होते, असा गौप्यस्फोट आ. जयकुमार गोरे यांनी केला. जनतेला लुबाडून भ्रष्टाचाराने गोळा केलेली त्यांची संपत्ती लवकरच रडारवर येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
विरळी येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनानंतर आयोजित सभेत ते बोलत होते. गोरे म्हणाले, विधानसभा निवडणूकीत रावणरुपी लुटारु देशमुखांनी कधी नव्हे ते मतदारसंघात जातीपातीचे राजकारण केले. पैशांच्या जीवावर 88 हजार मते घेतली. मात्र, कोरोना काळात ते कुलूपबंद होते. ते गायब असल्याची बोंबाबोंब सुरु झाल्यावर शेवटी शेवटी विविध कंपन्यांकडून काही पैसे आणायचे नाटक करताना त्यातही भ्रष्टाचार केला. लोधवडेतील देशमुखांच्या ऊसालाही मी आणलेले उरमोडीचे पाणी मिळते. मी मतदारसंघात आल्यावरच पाणी आडवा पाणी जीरवा संकल्पना सुरु झाली. साखळी सिमेंट बंधारे माझ्याच काळात झालेत, त्यामुळे जयकुमारचे नाव घ्यायचीही देशमुखांची लायकी नाही.
मी त्यांच्यासारखा लुटारु रावण नाही. माण खटावच्या जनतेचा मी सेवक आहे. मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवायला मला पुन्हा आमदार व्हायचे आहे, त्यासाठी तुमच्यासारख्या बाजारबुणग्यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. फाटलेल्या आभाळाला टाके घालायचे काम मी गेली 12 वर्षे करतोय. 143 कोटींच्या निधीतून शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी नेण्याची कामे सुरु आहेत. माझ्या मतदारसंघातील सर्व भागात पाणी नेल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. माणमधील 24 पैकी 18 सोसायटय़ा आमच्या ताब्यात आल्यात. पण आम्ही मस्ती केली नाही. देशमुख मात्र थोडय़ा सोसायटय़ा ताब्यात येताच हुरळून गेले आहेत. नोकरीत त्यांना पगार किती होता, त्यांच्याकडे किती संपत्ती आहे याची लवकरच चौकशी होणार आहे. त्यांच्याकडील माल बघून त्यांचीच पार्टी त्यांना सोडत नाही. जनताही तुम्हाला सोडणार नाही. लवकरच जिहेकठापूरच्या पाण्याने अंघोळ घालून त्यांचे शुध्दीकरण करावे लागणार असल्याचा टोलाही गोरेंनी लगावला.