लॉकडाऊनमुळे घरात बसण्याची छान सवय जडली आहे. शरीर आळशी झाले आहे. पण वेळ मात्र माझ्यापेक्षा आळशी झाला आहे. चटकन हलत नाही. त्याला ढकलावे लागते. मग तो हळूहळू पुढे जातो.
पूर्वी असे नव्हते. दिवसभर हजार कामांची धावपळ चालू असे. अशा वेळी मोबाईल वाजला आणि त्याच्या पडद्यावर अनोळखी नंबर दिसला तर मी घेत नसे. चुकून घेतला आणि एखाद्या कंपनीच्या, बँकेच्या मार्केटिंग विभागाचा फोन असला तर समोरून बोलणाऱया महिलेने मंजुळ आवाजात “मी विजय सरांशी बोलू शकते का?’’ हा प्रश्न विचारून होण्याच्या आधीच फोन बंद करायचो. काही नाही. या महिला उगीच आपल्याला हजारो-लाखो रुपयांचे कर्ज देऊ करतात किंवा कुठली तरी वस्तू विकत घ्यायचा लाडे लाडे आग्रह करतात. हे फोन परवडले. काही फोन भारी असतात. फोनवर बोलणारी महिला “मी एलआयसीची पॉलिसी घेतली आहे आणि मला त्या पॉलिसीचे पन्नास ते साठ लाख किंवा एक ते दीड कोटी रुपये मिळणार आहेत’’ असा गोड निरोप देते आणि ते लक्षावधी-करोडो रुपये माझ्या खात्यात टाकण्यासाठी बँक खात्याचे तपशील मागते. हे फोनदेखील मी फार चर्चा न करता बंद करायचो.
पण अलीकडे वेळ जाण्याची जटिल समस्या उभी आहे. मी फोन घेणे टाळत नाही. बँकेच्या किंवा खाजगी कंपनीच्या कॉल सेंटरवरून आलेल्या फोनवर बोलणाऱया महिला बिचाऱया नोकरीचा भाग म्हणून फोन करीत असतील. त्यांची एकदोन वाक्मये ऐकून घेऊन त्यांना सौजन्यपूर्वक नकार देतो. पण मला लाखो रुपयांचे आमिष दाखवून बँक खात्याचे तपशील मागणाऱया स्त्रियांशी गप्पा मारून कालहरण करतो. त्यांना कोडय़ात पडणारे बँक खात्याचे तपशील देतो. त्या पुनः पुन्हा विचारतात. मग मी त्यांना प्रस्ताव देतो की तुम्ही रोख रक्कम घेऊन आमच्याकडे चहाला या. या ऑफरनंतर त्या नंबरवरून फोन येणे थांबते. बोगस फोनचा आणखी एक प्रकार म्हणजे तुमचे खाते बंद होणार आहे. पेडिट कार्डचा नंबर आणि पिन सांगा अशी विनंती आली की त्यांना चुकीचे नंबर सांगून गप्पा मारण्यातदेखील खुमारी असते.
एकूण काय, माझी आरामखुर्ची हे कॉल रिसिव्हर सेंटर झाले आहे. मी सध्या काय करतो, तर या सेंटरवर बसून फोन अटेंड करतो.