ऑनलाईन टीम / कोलकाता :
भाजपचे त्रिपुरा येथील आमदार आशिष दास यांनी मंगळवारी भाजपला रामराम ठोकत असल्याची घोषणा केली. पंतप्रधान मोदींवर विश्वास ठेवला होता, त्या विश्वासाला तडा गेला आहे. भाजपची सत्ता असलेल्या त्रिपुरामध्ये अराजकता पसरली असून, भाजपला मदत करुन मी चूक केली. याचा पश्चाताप म्हणून कालीघाट येथे मुंडन केल्याचे दास यांनी म्हटले आहे.
पश्चिम बंगालच्या भवानीपूर मतदारसंघातील पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जींनी दमदार विजय मिळवत मुख्यमंत्रीपद कायम राखले. तर भाजप उमेदवार प्रियंका टिबरेवाल यांचा 58 हजार 832 मतांनी पराभव झाला. या निवडणुकीतील विजयाबद्दल दास यांनी ममता बॅनर्जींचे कौतुक करत भाजपला सोडचिठ्ठी देत असल्याचे जाहीर केले. दरम्यान, दास यांनी कोलकाता येथील प्रसिद्ध कालीघाट मंदिरात जाऊन यज्ञ केला. तसेच मुंडनही केले. 2023 पर्यंत भाजप पराभूत होत नाही, तोपर्यंत मी असाच राहणार असल्याचे दास यांनी सांगितले. भाजपची सत्ता असलेल्या त्रिपुरामध्ये अराजकता पसरली आहे. राज्य सरकारच्या कामगिरीवर लोक नाराज असल्यामुळे मी पक्ष सोडत आहे, असेही त्यांनी सांगितले. दास हे तृणमूलमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.