ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईकरांची लाईफ लाईन असलेली लोकल सेवा अखेर 1 फेब्रुवारीपासून सुरु करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरवा सिग्नल दाखवला आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांना लोकल प्रवास करता येणार आहे. मात्र, यासाठी काही नियम देखील असणार आहे.
यानुसार, या ठिकाणी गर्दी होणार नाही अशारीतीने सर्व प्रवाशांसाठी ठरावीक वेळेत प्रवास करता येणार आहे. दरम्यान, मुंबईतील कार्यालयीन वेळांमध्ये सुधारणा करण्याची देखील विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
- कधी प्रवास करता येईल?
सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी 7 वाजेपर्यंत तसेच दुपारी 12 पासून दुपारी 4 पर्यंत आणि रात्री 9 पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येईल.
- कधी प्रवास करता येणार नाही?
म्हणजेच सर्वसामान्य प्रवाशांना सकाळी 7 ते दुपारी 12 व दुपारी 4 ते रात्री 9 या कालावधीत उपनगरीय रेल्वे सेवांत प्रवास करता येणार नाही. या वेळात फक्त यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या विशिष्ट प्रवर्गातील प्रवासी प्रवास करू शकतील.
- उपहारगृहे व दुकानांसाठी वेळा
मुंबई व मुंबई महानगर क्षेत्रातील दुकाने व आस्थापना रात्री 11 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येतील तसेच उपहारगृहे रात्री 1 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येतील. दुकानांसाठी कमाल कर्मचाऱ्यांची 30 टक्के उपस्थितीची अट तसेच उपहारगृहे, फूड कोर्ट यासाठी वेळोवेळी निर्गमित एसओपीप्रमाणे अंमलबजावणी राहील असेही स्पष्ट करण्यात आले आहे .
सर्वांसाठी लोकल प्रवासाची सुविधा नेहमीप्रमाणे सुरु करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन मुंबई व उपनगर परिसरातील कार्यालये व आस्थापने यांनी आपापल्या कार्यालयीन वेळांत आवश्यक तो बदल करावा अशी विनंती देखील मुख्य सचिव यांच्या या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
या बाबतीतली सुचना मुंबई व मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी यांना देखील देण्यात आली आहे.