केंद्रसरकारने लोकांना कोणत्याही प्रवासापासून दूर राहण्यास सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारला विवेकाने निर्णय घ्यावा लागेल. या निर्णयामुळे कोरोनाप्रसार होणार नाही याची नुसती दक्षता नव्हे तर हमी द्यावी लागेल.
कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. देशात आणि राज्यात बाधितांची व मृत्यूची संख्या वाढत जात आहे. भारतातील वाढत्या आकडेवारीनंतर जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, आणखी वाईट दिवस पहावे लागू शकतात. या पार्श्वभूमीवर कोरोनापासून अंतर राखून असलेल्या तळकोकणात मात्र सारेकाही आलबेल आहे असे चिन्ह नाही. टाळेबंदीमुळे येथील जनजीवन प्रभावीत झाले असून ते पूर्व पदावर येण्याची सध्या तरी चिन्हे नाहीत.
रत्नागिरी जिह्यात कोरोनामुळे 6 जण बाधित झाले. त्यापैकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर एकजण उपचारानंतर घरी पोहोचला. चार जणांवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सुधारण्याकडे असल्याचे वैद्यकीय अधिकाऱयांचे म्हणणे आहे. सिंधुदुर्गात एका रुग्णाला उपचारानंतर घरी सोडण्यात आले. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिह्यात या रोगाची नव्याने लागण झाल्याचे वृत्त नाही.
राज्य सरकारने कोरोनाबाधित क्षेत्राची तीन भागात विभागणी केली आहे. जेथे 28 दिवसात रूग्ण सापडला नाही ते हरितक्षेत्र, जेथे 14 दिवसात रूग्ण सापडला नाही ते नारिंगी क्षेत्र, तर उर्वरित क्षेत्र हे लाल रंगाने दर्शवलेले क्षेत्र म्हणून घोषित करायचे सरकारने ठरवले आहे. या निकषांचा विचार करावयाचा झाल्यास सिंधुदुर्ग जिल्हा रत्नागिरीपेक्षा लवकर कोरोनामुक्त होण्याची म्हणजे हरित क्षेत्रात समाविष्ट होण्याची शक्यता आहे. रत्नागिरीच्या सहाव्या रूग्णाला कोरोना झाल्याची पुष्टी एक आठवडय़ापूर्वी झाली होती. अद्याप या रूग्णांना घरी सोडण्यात आलेले नाही. शेवटचा रूग्ण घरी सोडल्यानंतर 28 दिवसांनी जिल्हा हरित क्षेत्रात समाविष्ट होईल, असे सांगण्यात येत आहे.
एका बाजूला कोकणातील कोरोना व्यवस्थापनाचे काम तळ कोकणात सुरु असताना दुसऱया बाजूला मुंबईकर चाकरमान्यांनी गावी येण्यासाठी राजकीय नेत्यांकडे तगादा लावला आहे. कामधंद्याच्या निमित्ताने अनेक कोकणी लोक मुंबईत गेले आहेत. एवढेच नव्हे तर वेगवेगळ्या ठिकाणी स्थिरावले आहेत. इतर लोकांसोबतच यातील अनेक चाकरमानी हे राहण्याच्या सोयीबाबतची गैरसोय सहन करून तेथे राहत आहेत. चांगल्या पदाची नोकरी आणि प्रतिष्ठा असली तरी अनेकांना गैरसोयीच्या ठिकाणी रहिवास करावा लागत आहे.
मार्चच्या अखेरच्या आठवडय़ात देशात टाळेबंदी जारी झाल्यानंतर कोणीच बाहेर पडायचे नाही असे सांगण्यात आले. यामुळे या मुंबईकरांची मोठी अडचण झाली. 10 बाय 10 च्या खोलीत 10 जणच नव्हे तर आळीपाळीने त्या जागेत राहणारे अनेकजण आहेत. त्या जागेतून पहिले लोक बाहेर पडल्याशिवाय दुसऱया लोकांना आत जाणे शक्य नसते. छोटय़ा जागांमध्ये झोपण्याची व्यवस्था रॅकवरदेखील करण्यात येत असते. अनेक ठिकाणी 20 ते 25 माणसे तर काही ठिकाणी 50 ते 100 माणसे स्वच्छतागृहांचा एकच संच वापरत असतात. अशावेळी कितीही सामाजिक अंतर आणि टाळेबंदी म्हटली तरी सामूहिक संसर्गाचा धोका कायम राहत आहे.
राज्यातील मुंबई आणि पुणे येथील कोरोना लागण काही केल्या कमी होत नाही. केंद्र सरकारने एक विशेष पथक दोन्ही शहरांना भेट देण्यासाठी पाठवले आहे. राज्यस्थान आणि मध्यप्रदेशमधील काही ठिकाणी असाच प्रकार घडला आहे. अशावेळी मुंबई आणि पुणे ही शहरे कोरोनाच्यादृष्टीने अतिजोखमीची ठिकाणे ठरली आहेत.
या पार्श्वभूमीवर कोकणी चाकरमान्यांनी गावाकडे जाण्याविषयी आपापल्या राजकीय नेत्यांकडे तगादा लावला आहे. यामुळे रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. अनिल परब यांनी रत्नागिरीत येऊन आढावा घेतला. प्रशासकीय अधिकाऱयांशी बोलणे केले. चाकरमान्यांना लॉगडाऊन काळात कोकणात येऊ देण्यासाठी परवानगी मिळाल्यास प्रशासकीय यंत्रणा त्याला कसे तोंड देणार हा चर्चेचा मुख्य विषय होता. सध्या कोकणात असलेली आरोग्य यंत्रणेची घडी कोरोना आक्रमणामुळे पुरती दमून गेली आहे. असे असताना लाखापेक्षा अधिक लोक नव्याने येत असताना त्यांची सखोल तपासणी करणे आवश्यक ठरेल. तसे झाल्यास सध्या असलेला वैद्यकीय अधिकाऱयांचा तसेच अन्य आरोग्य कर्मचाऱयांचा ताफा तोकडा ठरेल. लाखापेक्षा अधिक लोक तपासले गेल्यास त्यातील निष्कर्ष आणि पाठपुरावा हेदेखील सोपे काम नाही, असे मंत्र्यांना सांगण्यात आले.
मुंबई आणि पुणे ही दोन्ही शहरे आत्यंतिक जोखमीच्या ठिकाणांमध्ये मोडतात. दोन्ही ठिकाणांहून येणाऱया लोकांवर कठोर अशी आरोग्य यंत्रणेची नजर लागेल. देशात 70 टक्क्यांहून जास्त लोकांना कोरोनाची कोणतीची लक्षणे आढळत नाहीत. मात्र ते या रोगाने बाधित आहेत हे अत्यंत धोकादायक असल्याचे आरोग्य अधिकाऱयांचे म्हणणे आहे. ही विपरीत परि†िस्थती लक्षात घेऊन चाकरमान्यांसाठी काम केले पाहिजे, असे देखील आरोग्य यंत्रणेचे म्हणणे आहे.
चाकरमान्यांना गावात प्रवेश नाही. त्यांनी गावाकडे यायचे असेल तर आधी तालुक्याच्या ठिकाणी 15 दिवस रहावे मगच गावामध्ये यावे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मुंबईतून गावी येणे म्हणजे कोरोनामुक्त असलेल्या गावाची जोखीम वाढवणे होय. काही गावांनी आपल्या सीमा काटेरी कुंपणाने बंद केल्या आहेत. केवळ पायवाट सुरु ठेवली आहे. गावात पाहुण्यांचे स्वागत नाही. गावातून लोकांनी बाहेर पडू नये म्हणून सरपंच, पोलीस पाटील आदी लोक आवाहन करत आहेत. देशस्तरावर असलेल्या भावनेचा स्वीकार मोठय़ा प्रमाणात गावच्या कर्त्याधर्त्यांनी केला आहे.
दुसऱया बाजूला चाकरमानी मुंबईकर अत्यंत हालात जीवन जगत आहेत. त्यांना जेवण्यासाठी, झोपण्यासाठी एवढेच काय तर राहत्या जागी बसायलासुध्दा सुखकर ठिकाण नाही. मुंबईकरांचे जीवन म्हणजे शिक्षेवर पाठवलेल्या व्यक्तीसारखे आहे. कदाचित यापेक्षा चांगल्या सुविधा तुरुंगातही मिळत असतील असे गमतीने सांगितले जाते. मानवी हक्कांचा विचार करून आम्हाला गावी परत जावू द्या असे मुंबईकर चाकरमानी म्हणत आहेत.
मुंबईत दिवसेंदिवस कोरोना जोखीम वाढत आहे. त्यातून काही लाख लोकांना कमी करता आले तर ती बाब चांगली आहे. शिवाय चाकरमानी मुंबईकर प्रामुख्याने सत्ताधारी पक्षाशी जवळीकही साधणारे आहेत. त्यामुळे या लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे गावी जावून राहू देण्यास सरकार विचार करत आहे. केंद्रसरकारने लोकांना कोणत्याही प्रवासापासून दूर राहण्यास सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारला विवेकाने निर्णय घ्यावा लागेल. या निर्णयामुळे कोरोनाप्रसार होणार नाही याची नुसती दक्षता नव्हे तर हमी द्यावी लागेल.
सुकांत चक्रदेव