वृत्तसंस्था/ जयपूर
पृथ्वी शॉच्या दणकेबाज नाबाद शतकाच्या जोरावर रविवारी येथे झालेल्या विजय हजारे करडंक क्रिकेट स्पर्धेतील इलाईट ड गटातील सामन्यात मुंबईने दिल्लीचा 7 गडय़ांनी पराभव केला.
या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून दिल्लीला प्रथम फलंदाजी दिली. दिल्लीने 50 षटकांत 7 बाद 211 धावा जमविल्या. त्यानंतर मुंबईने 31.5 षटकांत 3 बाद 216 धावा जमवित हा सामना जिंकला.
दिल्ली संघातर्फे हिंमत सिंगने एकाकी लढत देत नाबाद 106 धावा जमविल्या. पण त्याचे नाबाद शतक वाया गेले. धवल कुलकर्णी आणि मुलानी यांच्या भेदक माऱयासमोर दिल्लीची सुरूवातीला स्थिती 3 बाद 10 अशी केविलवाणी होती. रावत आणि शेखर धवन यांना खाते उघडता आले नाही. दिल्लीचे हे दोन्ही फलंदाज धावचीत झाले. त्यानंतर नितीश राणा 2 धावावर बाद झाला. धवल कुलकर्णीने राणा आणि सिद्धू यांचे बळी घेतले. सिद्धूला खाते उघडता आले नाही. दिल्लीचा निम्मा संघ 23 धावांत तंबूत परतला होता. के. शर्मा 5 तर ललित यादव 5 धावावर बाद झाले. दिल्लीने यावेळी 6 बाद 32 धावापर्यंत मजल मारली होती. दरम्यान हिंमत सिंग आणि वशिष्ट यांनी सातव्या गडय़ासाठी 122 धावांची भागिदारी केली. हिंमत सिंगने 145 चेंडूत नाबाद 106 तर वशिष्टने 70 चेंडूत 6 चौकारांसह 55 धावा जमविल्या. कर्णधार संगवानने नाबाद 28 धावा जमविताना हिंमत सिंग समवेत 57 धावांची भागिदारी केली. मुंबईतर्फे धवल कुलकर्णीने 3 तर मुलानीने दोन गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना मुंबईच्या पृथ्वी शॉने 15 चौकार आणि 2 षटकारांसह 89 चेंडूत नाबाद 105 धावा फटकाविल्या. कर्णधार सुर्यकुमार यादवने 33 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांसह 50 धावा जमविताना तिसऱया गडय़ासाठी 93 धावांची भागिदारी केली. कर्णधार अय्यरने 39 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 39 धावा जमविताना शॉ समवेत दुसऱया गडय़ासाठी 82 धावांची भागिदारी केली. दिल्लीतर्फे ललित यादवने 32 धावांत 2 गडी बाद केले. सलामीचा जसवाल 8 धावांवर बाद झाला.
संक्षिप्त धावफलक
दिल्ली 50 षटकांत 7 बाद 211 (हिंमत सिंग नाबाद 106, वशिष्ट 55, सांगवान नाबाद 28, धवल कुलकर्णी 3-35, मुलानी 2-33), मुंबई 31.5 षटकांत 3 बाद 216 (पृथ्वी शॉ नाबाद 105, सुर्यकुमार यादव 50, अय्यर 39, ललित यादव 2-32).