ऑनलाईन टीम
आयपीएल २०२० मध्ये मुंबई इंडियन्सने विजयी पंच मारला आहे. दिल्ली कॅपिटल्सला अंतिम सामन्यात पराभूत करत मुंबईने पाचव्यांदा आयपीएल स्पर्धा जिंकली. तर २०१९ चे आयपीएल विजेतेपद २०२० मध्येही कायम राखण्यात मुंबई यशस्वी ठरली आहे. तर या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने दमदार खेळीसह मुंबई इंडियन्सकडून ४००० धावा करण्याचा पहिला मान पटकावला आहे.
दरम्यान, अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून दिल्लीने पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार श्रेयस अय्यर ६५ (५० चेंडू) आणि रिषभ पंतच्या ५६ (३८ चेंडू) धावांच्या बळावर मुंबईला १५७ धावांचे आव्हान दिले. दिल्लीने सात गड्यांच्या मोबदल्यात १५६ धावा केल्या.
१५७ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबईची सुरुवात चांगली झाली. कर्णधार रोहित शर्माने ५१ चेंडूत ६८ धावा केल्या. क्विंटन डिकॉक १२ चेंडूत २० धावा करून बाद झाला. तर इशान किशनने १९ चेंडूत ३३ धावांची खेळी केली. त्यामुळे मुंबईने अंतिम सामना ५ गडी आणि ८ चेंडू राखून जिंकला.
मुंबईने यापूर्वी २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ मध्ये आयपीएल स्पर्धा जिंकली आहे.