ऑनलाईन टीम / मुंबई :
मागील 10 महिन्यांपासून बंद असलेली मुंबईची लाईफलाईन आजपासून सर्वसामान्यांसाठी खुली झालेली आहे. मागील 10 महिन्यांपासून शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी सरकारने मुंबई लोकल सुरु केली होती. मात्र सर्वसामान्यांना लोकलमध्ये प्रवेश देण्यात आलेला नव्हता. पण आजपासून मात्र ठराविक वेळेत सर्वसामान्यांना लोकल प्रवास करता येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आजपासून जरी मुंबई लोकल सेवा सुरु झाली. दादर स्टेशनवर सकाळपासूनच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. तर दुसरीकडे नालासोपारा रेल्वे स्थानकात नागरिकांना वेळेत तिकिट मिळत नसल्याचे चित्र, पाहायला मिळाले. एक ते दीड तासापासून लोकांना रांगेत उभे रहावे लागले. सकाळी पहिल्या ट्रेनपासून सकाळी 7 पर्यंतच लोकलमध्ये प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रत्येक रेल्वेस्थानकावर तिकीट खिडक्या वाढवणे गरजेचे होते पण त्या वाढवल्या नसल्याने तिकिटासाठी प्रवाशांना लांबच लांब रांगा लावून सुद्धा वेळेत तिकीट मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळाले.
रेल्वेने सर्वसामान्य प्रवाशांसाठी वेळेचं बंधन घातलं आहे. सकाळी 7 ते दुपारी 12 आणि दुपारी 4 ते रात्री 9 ही वेळ सोडून उर्वरित वेळेत सर्वांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.
दिलेल्या वेळेशिवाय कुणी सर्वसामान्य नागरिक लोकल प्रवास करताना आढळून आला तर त्याला 200 रुपये दंड आणि एक महिन्याचा तुरुंगवास भोगावा लागू शकतो. त्यामुळे सर्वसामान्यांना विशिष्ट वेळेतच प्रवास करावा लागणार आहे.