ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईच्या एका तीन मजली चाळीचा काही भाग कोसळला असल्याची घटना घडली आहे. मालाडच्या मालवणीमध्ये ही घटना घडली. यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 7 जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. ही इमारत शेजारच्या घरांवर कोसळल्यानंतर आसपासच्या इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य अद्यापही सुरु आहे. काही जणांना ढिगाऱ्याखालून काढण्यात यश आले असून काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मध्यरात्रीपर्यंत ढिगाऱ्याखालून जवळपास 16 लोकांना रेस्क्यू करण्यात आले होते. दरम्यान, या इमारतीत एकूण दोन ते तीन कुटुंब याठिकाणी राहत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बचावकार्य अद्याप सुरु आहे. खबरदारी म्हणून इमारतही रिकामी करण्याचा निर्णय घेण्यात आला. येथील रहिवाशांना तातडीने अन्यत्र हलवण्यात येत असून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरु आहे.
दुर्घटनेतून रेस्कू करण्यात आलेल्या 8 लोकांना शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच इतर लोकांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा परिसर दाटीवाटीचा असल्याने घटनास्थळी पोहोचण्यासाठी असलेला रस्ता अरुंद आहे. त्यामुळे बचावकार्यात अडचणी येत आहे. घटनास्थळी पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पालकमंत्री अस्लम शेख घटनास्थळी पोहोचले होते. यावेळी त्यांनी मुसळधार पावसामुळे इमारत कोसळल्याची माहिती दिली.
पोलिसांनी मध्यरात्री दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री जवळपास साडे अकरा वाजता घडली. सुरुवातील आसपासच्या लोकांनी एकत्र येत 16 जणांना रेस्क्यू केले. अद्यापही काही लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे.