ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व खासगी, सरकारी, महापालिकेच्या शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी हे आदेश दिले आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, येत्या सोमवारपासून म्हणजेच 23 नोव्हेंबरपासून राज्यातील इतर भागांमध्ये नववी ते बारावीचे वर्ग सुरु होणार आहेत. मात्र मुंबई महापालिका आयुक्तांनी आपल्या अधिकारांचा वापर करत येत्या 31 डिसेंबरपर्यंत शहरातील कोणत्याही शाळा सुरु होणार नाही, असा निर्णय घेतला आहे.
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे 31 डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईतील शाळा 23 नोव्हेंबरला सुरू होणार नाही, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद राहिल्याने प्रशासनाला तयारीसाठी बराच वेळ मिळणार आहे. सध्या मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये टेस्टिंग कॅम्प सुरु आहेत. सॅनिटायझेशन केले जात आहे. ही मास टेस्टिंग मोहीम ही कालपासूनच महापालिकेने राबवायला सुरु केली आहे. शिक्षकांच्या टेस्टिंग करणे त्यानंतर काळजी घेण्याच्या सूचना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे याच्या तयारीसाठी महापालिकेला 31 डिसेंबरपर्यंतचा कालावधी मिळणार आहे.