कमलताई परुळेकर, डोमलेवाडी ग्रामस्थांचा आरोप
प्रतिनिधी / ओरोस :
मुंबईसारख्या ‘हॉटस्पॉट’मधून सिंधुदुर्गात दाखल झालेल्या
एका निवृत्त पोलिसाच्या मुलाला व पत्नीला 14 दिवसाचे विलगीकरण न देता त्यांना दोन दिवसात
वशिल्याने घरी सोडण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या कमलताई परुळेकर आणि डोमलेवाडी
ग्रामस्थांनी केला आहे. सर्वसामान्यांना एक न्याय आणि काहींना सवलत यामुळे प्रशासनाकडूनच
कायदे धाब्यावर बसविले जात आहेत.
प्रशासनाच्या या भूमिकेमुळे डोमलेवाडी येथे कोरोनाचे संकट आल्यास प्रशासनालाच
जबाबदार धरावे, अशी मागणीही येथील ग्रामस्थांनी केली आहे.
डोमलेवाडी येथील दोन व्यक्ती (मुलगा व आई) मुंबईवरून 20 एप्रिलला सिंधुदुर्गात आले आहेत. ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात दोन दिवस ठेवून त्यांना 22 रोजी घरी सोडण्यात आले. ‘होम क्वारंटाइन’च्या अटीवर सोडले असल्यास त्यांनी तसे राहणे आवश्यक आहे. मात्र, त्यांच्याकडून ‘होम क्वारंटाईन’ही पाळले जात नाहे. संबंधित मुलगा मुंबईला परत जाण्यासाठी पास मिळविण्यासाठी फिरत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
याबाबत वाडी हुमरमळा सरपंचांना माहिती देण्यात आली.
त्यांनी त्यांचा रिपोर्ट निरंक असल्याने सोडल्याचे सांगितले. त्यानंतर संबंधित मुलगा
कुडाळला गेल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. याबाबत ग्रामपंचायत सदस्यांचे लक्ष वेधण्यात
आले. त्यांनीही सरपंचांचे लक्ष वेधले. त्यानंतर सरपंचांना फोन करण्याची ही वेळ नसल्याचे
उत्तम पालव यांना सरपंचाच्या घरातून सांगण्यात आले. तसेच काही
तक्रार असल्यास अर्ज ग्रामपंचायत कार्यालयात देण्याचा सल्ला देण्यात आला.
त्यानंतर आरोग्य सेविका आणि तालुका वैद्यकीय अधिकारी यांचे लक्ष वेधण्यात आले. तालुका
वैद्यकीय अधिकाऱयांनी सकाळी बघतो, असे सांगितल्याची माहिती
ग्रामस्थांकडून देण्यात आली.
या घडामोडेनंतर कमलताई परुळेकर यांचे लक्ष वेधण्यात
आले. त्यांनी
ग्रामसेवक व पोलीस पाटलांना विचारणा केली. तसेच आपत्ती व्यवस्थापनचेही
लक्ष वेधले. त्यावेळी त्यांना घराबाहेर पडलात तर कारवाई करणार असल्याचे पत्र देऊनच सोडण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.
जलद टेस्ट होते का?
दरम्यान, दीड दिवसात रिपोर्ट मिळण्याची सोय जिल्हय़ात
झाली आहे का? असेल तर अनेक विद्यार्थी, नोकरदार गोवा सीमेवर अडकले आहेत, त्यांची जलद
टेस्ट का होत नाही? आमच्या ग्रा.पं.ने जाहीर पत्रक काढून पुणे, मुंबईहून कोणी गावी
आल्यास ग्रा. पं. ला कळवा, असे जाहीर केले आहे. सद्यस्थितीत घरातील माणूस मेला तरी
अंत्यविधीनंतर घरातील सर्वांना संस्था विलगीकरण केले जाते. मग
प्रशासनाच्या या भूमिकेमागचे इंगित काय, असा सवाल परुळेकर यांनी उपस्थित
केला आहे.
निवृत्त पोलिसाचा मुलगा
निवृत्त पोलिसाचा मुलगा असल्यामुळे पोलीस प्रशासन या घटनेकडे गांभीर्याने पाहात नाही व स्पेशल ट्रिटमेंट देतात, असे मत व्यक्त करण्यात आले आहे. त्यांच्या घरात 6/7 व्यक्ती असून सर्वजण एकत्र राहतात. त्यामुळे अशाप्रकारे बेकायदेशीर काम करणाऱयांची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. गोविंद पालव, पी. एल. पालव, शिवा पालव, कमल परुळेकर आदींनी याबाबतचे पत्रक प्रसिद्धीसाठी दिले आहे.