सलग सात दिवस करत होते प्रवास, दोन चिमुरडय़ांचाही समावेश
प्रतिनिधी/ खेड
मुंबई येथून चालत गावी येणाऱयांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. लॉकडाऊनमुळे सुरू असलेल्या उपासमारीला कंटाळून दिवा-मुंबईतून 7 दिवस पायी प्रवास करत गावी येणाऱया 34 चाकरमान्यांना पोलिसांनी तुळशी फाटा येथे अडवत आरोग्य प्रशासनाच्या स्वाधीन केले. यामध्ये दोन चिमुरडय़ांचाही समावेश आहे. या सर्वांची वैद्यकीय तपासणी करून क्वारंटाईन करण्यात आले.
लॉकडाऊनमुळे मुंबईसह उपनगरातील चाकरमानी पायी प्रवास करत गाव गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. गावी येणाऱया चाकरमान्यांची संख्या वाढत चालल्याने पोलीस प्रशासनासह आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. कशेडी येथे पोलीस पकडतील या भीतीपोटी अनेक चाकरमानी कशेडी घाटाला पर्याय असलेल्या विन्हेरे मार्गे जंगलमय भागातून येण्याचा धोका पत्करत आहेत. पोलिसांनी मोक्याच्या मार्गावर गस्त वाढवल्याने पोलिसांना चकवा देणारे चाकरमानी पोलिसांच्या कचाटय़ात अडकत आहेत.
लॉकडाऊनमुळे रोजगार बुडाल्याने उपासमार सुरू असून याचमुळे दिवा-मुंबई येथे नोकरीनिमित्ताने वास्तव्यास असलेल्या 34 चाकरमान्यांनी पायी प्रवास करत गावी येण्याचा निर्णय घेतला. सलग सात दिवस प्रवास करणाऱया या चाकरमान्यांना प्रवासादरम्यान कोणीच न अडवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्हय़ात विविध ठिकाणी जाणाऱया सर्व चाकरमान्यांना महामार्गावरील तुळशी फाटा येथे रोखण्यात आले. उपासमारीला कंटाळून चालत प्रवास करण्याचा निर्णय घेतल्याचे चाकरमान्यांनी सांगितले. यामध्ये दोन चिमुरडय़ांचा समावेश आहे. या सर्वांचे स्वॅबचे नमुने घेऊन तपासणीसाठी मिरज येथे पाठवण्यात आले आहेत….