तस्करीचा नक्षवाद्यांशी संबंध असल्याचा संशय
ऑनलाईन टीम / नवी मुंबई
मुंबईला भारताची अर्थिक राजधानी म्हटले जाते. कारण मुंबईत असणारी उद्योगांची संख्या, चित्रपट सृष्टी, न्हावा – शेवा , जेएनपीटी सारखे सुसज्ज बंदरे, ही नैसर्गिकरीत्या मालवाहतूकीला अनुकूल आहेत, देशभरातुन जोडले गेलेले रेल्वे, हवाई, रस्ते यांचे जाळे, आणि उपलब्ध असणारा श्रमिक वर्ग या साऱ्याच्या परिणामामुळे मुंबई ही देशाच्या उद्योगाचं केंद्र बनली आहे. याच पार्श्वभुमीवर मोठ्या प्रमाणात होणारी माल वाहतुकीचे निमित्ताने अवैध उद्योगासाठी ही प्रयत्न केले जातात. याच पार्श्वभुमीवर दुबईला रक्तचंदन पाठवण्याच्या प्रयत्नात असलेल्या मुख्य आरोपीला सीमाशुल्क विभागाने शनिवारी अटक केली. याप्रकरणी सीमाशुल्क विभागाने न्हावा शेवा बंदारातून १५ हजार किलो रक्त चंदन जप्त केले आहे. आंध्र प्रदेशातून आणण्यात आलेल्या या रक्तचंदनाशी तेथील नक्षलवाद्यांचा संबंध आहे का? याबाबत तपासणी करण्यात येणार आहे. तपासात तशी माहिती अद्याप समोर आली नसली तरी तपास सुरु असुन याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
न्हावा शेवा बंदारवरून दुबईतील जाबेल अली बंदरावर रक्तचंदन पाठवले जाणार असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाच्या विशेष तपास व गुप्तवार्ता शाखेला मिळाली होती. त्यानुसार २४ डिसेंबरला जेएनपीटी येथील जीटीआय टर्मिनस येथे शोध मोहिम राबवण्यात आली. त्यावेळी तेथे २० फुटी कंटेनरमध्ये हे रक्तचंदन सापडले. रिकामी बाटल्या असल्याचे जाहीर करून त्याऐवजी बाटलीच्या आकारातील रक्तचंदनाचे खोड दुबईला पाठवण्यात येणार होते. या कंटेनरमध्ये १५ हजार २० किलो रक्त चंदन सापडले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत १५ कोटी दोन लाख रुपये असल्याचे सीमाशुल्क विभागाने सांगितले.
माहितीच्या आधारे सीमाशुल्क विभाग मुख्यआरोपी संजय विठ्ठल शिंदे(४१) याच्यापर्यंत पोहोचले. शिंदे हा नवी मुंबईतील वाशी येथील रहिवासी असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. मिळालेल्या माहितीवरून शिंदेचा ही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर शिंदेला शुक्रवारी अटक करण्यात आली. याप्रकरणी सीमाशुल्क विभाग अधिक तपास करत आहे.