ऑनलाईन टीम / मुंबई :
मागील अडीच महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेली लोकल अत्यावशक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून सुरु करण्यात आली. सोमवारी सकाळी 5.30 वाजता चर्चगेट वरून विरारसाठी पहिली लोकल धावली.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महानगर परिसरात कामानिमित्त ये जा करणाऱ्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी ही सुविधा मध्य आणि पश्चिम मार्गावर सुरू करण्यात आली आहे. या दोन्हीं मार्गांवर एकूण 642 फेऱ्या करण्यात येणार आहेत. या फेऱ्या पहाटे 5.30 ते रात्री 11.30 या काळात 15 ते 20 मिनिटांच्या फरकाने धावणार आहेत. तसेच लोकल मध्ये गर्दी होऊ नये म्हणून केवळ 700 लोकांना प्रवेश दिला जाणार आहे.
तसेच शासकीय किंवा खाजगी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र पाहूनच त्यांना ट्रेनचे तिकीट दिले जाणार आहे. यानंतर कर्मचाऱ्यांना क्यूआर कोड आधारित ई-पास दिले जातील. जे कर्मचारी वैद्यकीय दृष्ट्या सुदृढ आहेत. त्याच व्यक्तींना लोकलमधून प्रवास करता येणार आहे. मात्र, सर्वसामान्यांना यामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. असे ही सांगण्यात आले आहे.