ऑनलाईन टीम / मुंबई :
काल मुंबईत मुसळधार पावसाने घेतलेले बळी, भांडूप येथील जलशुद्धीकरण केंद्रात शिरलेले पाणी आणि मिठी नदीला आलेला पूर, या वरून भाजपचे आमदार आशीष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकार आणि महानगरपालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.
ज्या अधिकाऱ्यांना मुंबईवर येणारे धोके आणि संकटे कळत नाहीत, अशा अधिकाऱ्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली, असे सांगतानाच एवढे सगळे अधिकारी असतानाही मुंबईत अशी परिस्थिती उद्भवतेच कशी?, असा सवाल देखील आशीष शेलार यांनी उपस्थित केला आहे. आता मुख्यमंत्र्यांनी तातडीने नगरसेवक, आमदार, खासदार, पालिकेचे अधिकारी आणि या विषयातील तज्ज्ञांची बैठक बोलावून आढावा घ्यावा, असे आवाहनही शेलार यांनी केले आहे.
मुंबईत यावेळी दिसणारे हे बदल धोकादायक वाटत आहेत. नंतर हळहळ व्यक्त करण्यात काय अर्थ?मुंबईत यावेळी पहिल्यांदा मिठी नदीचे पाणी ओहोटी असली तरी ओसरत नाही. भांडूपच्या जलशुद्धीकरण केंद्रात पुराचे पाणी घुसले… गेली पंचवीस वर्षं लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना असा अनुभव आला नव्हता, त्यामुळे भविष्यातील मुंबईवर बेतणाऱ्या मोठ्या संकटाचे हे संकेत तर नाही ना?, अशी भीती आशिष शेलार यांनी यावेळी व्यक्त केली आहे.