ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईतील ‘नाईट लाईफ’ला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तत्त्चतः मान्यता देण्यात आली असून, येत्या 26 जानेवारीपासून मुंबई 24 तास सुरू राहणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबईत मोठय़ा प्रमाणात रेव्हेन्यू आणायचा असेल तर मुंबई 24 तास खुली राहणे गरजेचे आहे. त्यामुळे रोजगारही वाढतील. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईतील नाईट लाईफला तत्त्वतः मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या 26 जानेवारीपासून मुंबई आता 24 तास खुली राहणार आहे.
पर्यटन वाढविण्यासाठी नाईट लाईफचा निर्णय घेण्यात आला आहे. विविध प्रकारचे मॉल, हॉटेल्स, फुड स्टॉल आणि दुकाने आता 24 तास खुली ठेवता येणार आहेत. पब आणि बारसाठी नवीन नियम नाहीत. पोलीस आणि वाहतूक विभागाशी चर्चा करुनच हा निर्णय घेण्यात आल्याचेही आदित्य यांनी सांगितले.