सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांची माहिती : 24 ते 31 ऑगस्ट कालावधीचे नियोजन
प्रतिनिधी / कणकवली:
गौरी-गणपती उत्सवासाठी कोकणात येणाऱया चाकरमान्यांकरिता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ऑनलाईन बूकिंगही सुरू करण्यात आले आहे. चाकरमान्यांना मुंबई, मुंबई उपनगर, पुणे तसेच राज्यातील इतर ठिकाणांहून जिल्हय़ात येण्याची सोय परिवहन महामंडळाने केली आहे. जिल्हय़ातून चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठीही रोज 34 बसेस 24 ते 31 ऑगस्ट या कालावधीत सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तिकीट नेहमीच्याच रातराणीच्या तिकीट दरानुसार एकेरी फेरीचेच असणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी दिली.
चाकरमान्यांसाठी 10 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी राहणार असल्याचे राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे 5 ऑगस्टपासून चाकरमान्यांसाठी ऑनलाईन संगणकीय आरक्षण प्रणालीस फेऱया उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱया रा. प. प्रवाशांना ई पास बंधनकारक असणार नाहीत. चाकरमान्यांसाठी एसटी बसेस या नेहमीच्या बसस्थानकांवरून सोडण्यात येणार असून त्या थेट जिल्हय़ातील बसस्थानकांवरच थांबतील. मार्गात डिझेल व्यतिरिक्त अन्य कोणतेही थांबे घेणार नाहीत. बसमधून केवळ 22 प्रवाशांनाच प्रवास करण्याची मुभा असणार आहे. एखाद्या गावातील 22 प्रवाशांनी रा. प. बसची मागणी केल्यास त्या चाकरमान्यांना थेट त्यांच्या गावापर्यंत सोडण्यात येणार आहेत. या प्रवासामध्ये रा. प. बसही जेवणासाठी थांबविण्यात येणार नाहीत. प्रवास करणाऱया प्रवाशांनी सोबत जेवण घेऊन यायचे आहे. फक्त दोन ठिकाणी नैसर्गिक विधीसाठी बस थांबविण्यात येणार आहे, असे रसाळ यांनी म्हटले आहे.
या प्रवासाकरिता केली जाणारी तिकीट आकारणी नेहमीच्या रातराणी तिकीट दराप्रमाणे एकेरी फेरीचेच तिकीट आकारणी राहील. त्या व्यतिरिक्त ग्रुप बूकिंग करणाऱया प्रतिनिधींनी नजीकच्या आगारात आरक्षण करावे. परतीच्या वाहतुकीसाठीही एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या बसेस जिल्हय़ातील प्रत्येक बसस्थानकावरून सोडण्यात येतील. तसेच ग्रुप बूकिंग करणाऱया प्रतिनिधींनी नजीकच्या आगारात / बसस्थानकात संपर्क साधून आरक्षण करावे. तसे केल्यास त्यांना थेट त्यांच्या गावातून थेट मुंबई उपनगर, पुणे वा राज्यातील अन्य ठिकाणी बसेस सोडण्यात येतील. एखाद्या गावातील 22 प्रवाशांनी कोकणात जाण्याकरिता व परत येण्याकरिता रा. प. बसची मागणी केल्यास त्यांना थेट त्यांच्या गावापर्यंत ये-जासाठी रा. प. बसेस सुविधा पुरविण्यात येणार असून याचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रसाळ यांनी केले आहे.
34 बसेस सोडण्याचे नियोजन
सिंधुदुर्ग विभागातून 24 ते 31 ऑगस्ट या कालावधीत दररोज विविध बसस्थानकांवरून 34 बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यात बोरिवली, मुंबई, ठाणे, विरार, कुर्ला नेहरुनगर, पुणे-निगडी, वल्लभनगर आदी ठिकाणी या बसेस धावणार आहेत. जिल्हय़ातून सुटणाऱया या बसेस सोडताना दोन गाडय़ांमध्ये 15 ते 30 मिनिटांचे अंतर राखून सोडण्याबाबतचे नियोजन करण्यात आले असल्याचे विभागीय वाहतूक अधिकारी अभिजीत पाटील यांनी सांगितले.