प्रतिनिधी / कोल्हापूर
मराठा आरक्षण स्थगितीची सुनावणी 25 जानेवारीनंतर नियमित सुरु होऊन 45 दिवसात निर्णय होईल. तोपर्यंत राज्य सरकारने जाहीर केलेली नोकर भरती स्थगित करुन तसे लेखी द्यावे, यासाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे नियोजित सोमवारी (दि.14) मुंबईतील आंदोलन कोणत्याही परिस्थितीत होणारच, असा निर्धार राज्य समन्वयक दिलीप पाटील व सचिन तोडकर यांनी व्यक्त केला. सोमवारी सकाळी 6 वाजता आंदोलक कोल्हापुरातून मुंबईकडे रवाना होणार आहेत. त्यांच्यावर सरकारने व पोलीस प्रशासनाने दबावतंत्र अवलंबल्यास कोल्हापूर बंदसह पुढील परिणामाची जबाबदारी त्यांच्यावरच राहील, असा इशाराही त्यांनी दिला.
दिलीप पाटील म्हणाले, मराठा आरक्षण वगळून सरकारने `एमएमआरडीए’, तलाठी, `एमपीएससी’, शिक्षक, पोलीस विभागाच्या नोकरभरतीचा घाट घातला आहे. या भरतीला आमचा विरोध आहे. त्यामुळे आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत ही भरती स्थगित करावी. सोमवारी (दि. 14) विधीमंडळ अधिवेशन आहे. त्या पार्श्वभूमीवर यापूर्वी नोकर भरतीच्या नियुक्ती मिळालेले मराठा उमेदवार व विद्यार्थी आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. यासाठी राज्यभरातून आंदोलक येणार आहेत.
सचिन तोडकर म्हणाले, लोकशाहीने दिलेल्या अधिकाराने मराठा समाजाचे आंदोलन होणार आहे. परंतु पोलीस प्रशासनाकडून दबाव तंत्राचा वापर करुन आंदोलकांना अटक केल्यास कोल्हापूर बंद होईल, याची सर्वस्वी जबाबदारी सरकारचीच राहील.
यावेळी शौर्यपीठ सकल मराठाचे प्रकाश सरनाईक, शैलेश जाधव आदी उपस्थित होते.
गाडी मोर्चाऐवजी निदर्शने
मराठा क्रांती मोर्चातर्फे नियोजित केलेला गाडी मोर्चा स्थगित करण्यात आला असून त्याऐवजी निदर्शने व आंदोलन केले जाणार आहे. सरकारच्या निर्णयाविरोधात हे आंदोलन होईल. जोपर्यंत सरकार नोकर भरती स्थगितीबाबत लेखी देत नाही, तोपर्यंत तीव्र आंदोलन केले जाईल. हे आंदोलन संख्यात्मक असेल, असे दिलीप पाटील यांनी सांगितले.
मुस्कटदाबी किती सहन करायची
मराठÎांचे आरक्षण स्थगित आहे, `सारथी’ ही राहिली नाही. सर्व बाजूंनी समाजाची मुस्कटदाबीच होत आहे. तसेच `ओबीसी’ नेते थेट रक्ताचे पाट वाहतील अशी वक्तव्ये करत आहेत. परंतु मराठा मंत्री व आमदार मात्र समाजाच्या बाजूने बोलत नाहीत. मग आम्ही काय करायचे? असा प्रश्न आहे. त्याचरोबर अशी वक्तव्ये करणाऱया मंत्र्यांना मंत्रीमंडळातून का काढत नाही? अशी विचारणा दिलीप पाटील यांनी केली.
चार जणांचा आवाज दाबून आंदोलन थांबणार नाही
सरकार व पोलीस प्रशासन मराठा आंदोलकांचा आवाज दाबू शकत नाही. चार लोकांना पकडून हे आंदोलन थांबणार नाही. राज्यभरात साडेचार कोटी मराठा समाज आहे, हे लक्षात घ्यावे, असे पाटील यांनी सांगितले.
साडे तीनशेहून अधिक आंदोलक रवाना
आंदोलन यशस्वी होण्यासाठी गत तीन दिवसांपासून रेल्वेसह विविध वाहनांनी 380 आंदोलक मुंबईला गेले आहेत. त्यामुळे कितीही दबाव आणला तरी आंदोलन होणार, असा निर्धार सचिन तोडकर यांनी व्यक्त केला.
आज 100 आंदोलक जाणार
मुंबईतील आंदोलनासाठी सोमवारी सकाळी 6 वाजता दसरा चौक येथून प्रातिनिधीक स्वरुपात 100 आंदोलक विविध वाहनातून रवाना होतील. मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी कोल्हापूर स्टाईलनेच हे आंदोलन होईल. पुणे ते खोपोली मार्गावर 11 चेकनाके पोलिसांनी उभे केले आहेत. मुंबईकडे जाणाऱया वाहनांची तपासणी केली जात आहे. तरीही आमचे आंदोलक मुंबईत पोहोचले आहेत, असे तोडकर यांनी सांगितले.