मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील आझाद मैदानावर मी एकटाच 26 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणाला बसणार असलो तरी राज्यभरातून मराठा बांधव उपोषणस्थळी येण्याची उत्स्फूर्तपणे तयारी करत आहेत. त्यांना मुंबईत येण्यापासून अटकाव करू नका, असे आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पोलिसांना केले आहे.
या संदर्भात खासदार संभाजीराजे यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, मराठा आरक्षण कायदा रद्द झाल्यानंतर मराठा समाजाच्या मागण्या राज्य सरकारकडे मांडल्या होत्या. त्या 17 जून 2021 च्या मुंबईतील बैठकीत राज्य शासनाने मान्यही केल्या होत्या. या गोष्टीला आठ महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्याप त्यांची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे मी मुंबईतील आझाद मैदानावर शुक्रवार 26 फेब्रुवारीपासून एकटाच बेमुदत उपोषणाला बसणार आहे. या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रातून सर्व स्तरातून पाठबळ, पाठिंबा मिळत आहे. राज्यभरातून मराठा समाजाची आझाद मैदानावर येण्यासाठी उत्स्फूर्तपणे तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे पोलिसांना विनंती आहे की, त्यांनी मुंबईत येणाऱया मराठा बांधवांना अटकाव करू नये. त्यांना रोखू नये.
कोल्हापूरमधून कार्यकर्ते रवाना
कोल्हापूर जिल्हय़ातील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते गुरूवारी रात्री मुंबईकडे रवाना झाले. शहरातील कार्यकर्ते भवानी मंडपातून बस, कारमधून रवाना झाले. तालुका स्तरातून कार्यकर्ते परस्पर मुंबईला रवाना होणार असल्याची माहिती देण्यात आली.
शहर, तालुकास्तरावर साखळी उपोषण
संभाजीराजे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हय़ात साखळी उपोषण आंदोलन सकल मराठा समाजाने आयोजित केले आहे. शहर, तालुका, ग्रामपंचायत स्तरावर सकल मराठाचे कार्यकर्ते साखळी उपोषणाला बसणार आहेत. कोल्हापूर शहरात दसरा चौकात आंदोलनासाठी मंडपाचीही उमारणी केली आहे.