ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे. त्यातच मुंबईत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. तरी देखील नागरिकांकडून नियमांचे पालन केले जात नाही आहे. अनेक नागरिक मास्क लावल्याशिवाय घराबाहेर पडत आहेत.
एकीकडे पालिकेकडून देखील कोरोना रुग्णांचा आकडा कमी व्हावा यासाठी विविध उपाय योजना केल्या जात आहेत. तरी देखील नागरिकांकडून नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. शनिवारी सकाळी शिवाजी पार्क आणि दादर मधील भाजी मार्केटमध्ये नागरिकांनी भाजी घेण्यासाठी प्रचंड गर्दी केलेली पाहायला मिळाली. यावेळी नागरिकांनी मास्क देखील घातला नव्हता. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन देखील करताना दिसत नव्हते.
दरम्यान, कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांनी नियमांचे पालन नाही केले तर पुन्हा एकदा लॉकडाऊन लावावे लागेल असा इशारा दिला होता. तरी देखील नागरिकांकडून सर्व नियम धाब्यावर बसवले जात आहे.
त्यातच शुक्रवारी आतापर्यंतची सर्वाधिक दैनंदिन कोरोना रुग्णवाढीची नोंद झाली. शुक्रवारी 3,062 नवे रुग्ण आढळून आले. तर 10 जणांचा मृत्यू झाला. यापूर्वी 8 ऑक्टोबर 2020 रोजी मुंबईत सर्वाधिक 2,848 रुग्णांची नोंद झाली होती. तर एकूण रुग्णांचा आकडा 3,55,879 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत 11,565 जणांनी आपला जीव गमावला आहे. सद्य स्थितीत 20,140 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत एकूण 3,23,281 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.