ऑनलाईन टीम / मुंबई :
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सर्वच सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. यामध्ये उत्तर भारतीय समुदायाद्वारे साजरा होणारा छटपूजेचा सण देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी 20 व 21 नोव्हेंबर रोजी हा सण येत आहे.
मात्र, यंदा मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर छटपूजेला बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. या सणाच्या निमित्ताने निर्माल्य विसर्जित करण्यासाठी नागरिक समुद्र किनारी, तलावाच्या काठी किंवा नदी किनारी सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी मोठ्या संख्येने नागरिक येतात आणि यावेळी समुद्रकिनारी होणारी गर्दी पाहता सोशल डिस्टन्सिंगचे पालन होणार नाही अशी शंका मुंबई महापालिकेला आहे. यामुळे छटपूजा विषयक सार्वजनिक कार्यक्रमांचे समुद्रकिनारी किंवा नदीकिनारी करण्यात येणाऱ्या आयोजनांवर नाईलाजाने प्रतिबंध घालण्यात आले आहेत.
त्याचवेळी या पूजेसाठी कृत्रिम तलावाचा पर्याय देण्यात आला आहे. या कृत्रिम तलावाच्या ठिकाणी भाविकांची गर्दी जमू नये यासाठी पोलिसांची मदत घेण्यात यावी. तसेच अशा ठिकाणी भाविकांना फक्त पूजेसाठी परवानगी द्यावी, असेही स्पष्ट केले आहे.
दरम्यान, मुंबई मुंबई महापालिकेच्या निर्णयानंतर भाजपने सरकारकडे मार्गदर्शक सूचना जारी करण्याची मागणी केली आहे. याबाबत मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी राज्यपालांना पत्र लिहिले आहे.