ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईवर पुन्हा एकदा चक्रीवादळाचे संकट घोंघावत आहे. मुंबईचे तापमान वाढले असून, समुद्राच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. समुद्रात वादळ येण्यापूर्वी जी लक्षणे दिसतात ती मुंबईत दिसून येत आहेत. समुद्राखालील हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे मुंबईवरील चक्रीवादळाचे संकट गडद होत आहे.
एका अहवालानुसार, तापमान वाढीमुळे समुद्रातील पाण्याची पातळी वाढत असून, ती अशीच वाढत राहिल्यास 2050 पर्यंत या वाढत्या जलपातळीमुळे सुमारे 5 हजार कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. इंटरगर्व्हन्मेटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजच्या सहाव्या मूल्यांकन अहवालाच्या दुसऱया भागात ही भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे वेळीच खबरदारी बाळगून उत्सर्जन कमी करणं गरजेचं आहे. जसजसा काळ जाईल तसतसे सर्वप्रथम किनारपट्टी भागातील प्राणी, वनस्पती, मासे यांच्यावर संकट उभे राहण्याची भीती आहे. यानंतर मुंबईसह संपूर्ण जगात वाढत्या तापमानामुळे मान्सूनपूर्व आणि मान्सूननंतरच्या काळात चक्रीवादळात वाढ होणार आहे. यामुळे मोठा विध्वंस सुरू होईल. लवकरच मुंबई चक्रीवादळाचा प्रभाव दिसू लागेल. हे फक्त मुंबईतच होणार नाही. मुंबईसह कोलकाता, चेन्नईसारख्या शहरांमध्ये समुद्राची पातळी वाढल्याने संकट वाढणार आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.
दरम्यान, समुद्राच्या पाण्याची पातळी वाढण्यापासून वाचवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात सुरक्षेसाठी प्रयत्न आणि आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे.