ऑनलाईन टीम / मुंबई :
हवामान खात्याने इशारा दिल्याप्रमाणे मुंबई आणि रायगड परिसरात सध्या पावसाला सुरुवात झाली मुंबई महानगर क्षेत्रात काल रात्रीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईत सकाळी सहानंतर पाऊसाने थोडी विश्रांती घेतली आहे. मात्र, काल ठाणे, नवी मुंबईत मध्यरात्रीनंतर विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस झाला.
- पहिल्याच पावसात पाणी साचायाला सुरुवात
मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण, बदलापूर, पालघर, जोगेश्वरी, अंधेरी, कांदवली, बोरवली, नालासोपारा, वसई याठिकाणी रात्रीपासून जोरदार पाऊस पडत होता. आता पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. तर काही ठिकाणी पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. या पहिल्याच पावसात मुंबईत पाणी साचायला सुरुवात झाली आहे. सायन, किंग्ज सर्कल भागात पाणी साचल्याने वाहनचालकांना गाड्या चालवताना संकटाचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, आजपासून 12 जूनपर्यंत राज्यातील सर्व जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. आजपासून चार दिवसांच्या काळात आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित काम करणाऱ्या सर्व यंत्रणेने, सर्व जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेने सज्ज आणि सतर्क राहून काम करावे, परस्परांशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
तर मुंबईसह कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला आहे. पुढील तीन दिवस राज्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. कोणीही समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.