ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईसह उपनगरात आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर सकाळपासूनच वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांकडून वाहनांची तपासणी सुरू असल्याने भाईंदर ते दहिसर चेक नाका क्रॉस करायला जवळपास दोन ते अडीच तासांचा कालावधी लागत आहे.
हीच अवस्था उपनगरात देखील आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले असून लवकरात लवकर लॉक डाऊन हटवा अशी मागणी होऊ लागली आहे. दरम्यान, कांदिवली विधानसभा मतदार संघाचे भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारने तुघलकी निर्णय घेतला आहे असे म्हणत सरकारवर टीका केली आहे.
सरकारकडून काही प्रमाणात लॉक डाऊन शिथिल करण्यात आले आहे. तसेच लोकांना संचार करण्यास परवानगी दिली आहे मात्र, पोलिसांकडून लोकांची अडवणूक केली जात आहे, त्यामुळे भातखळकर यांनी सरकारच्या या निर्णयाला तुघलकी असे म्हटले आहे. तसेच असे निर्णय कोणी घेतले याची चौकशी करण्याची ही मागणी केली आहे.