ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबई, नवी मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये काल रात्रीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे आजही राज्याभर पाऊस कोसळणार असून अनेक ठिकाणी थंडीचा पारा वाढण्याची शक्यता आहे. आज सकाळपासूनच मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, वसई-विरार, नाशिक, पुणे अशा महत्त्वाच्या शहरांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. इतकेच नाही तर पुढच्या 24 तासांत मुंबई, पुण्यासह नागपूर परिसरात हलक्या पावसाचा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
मुंबईमध्येही ढगाळ वातावरण झाले असून अनेक उपनगरांमध्ये हलक्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. नवी मुंबईमध्येही रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, रविवारी रात्रीपासूनच पावसाने हजेरी लावली. यामुळे सकाळी कामाला जाणाऱ्यांना कोरोनाच्या संकटात आणखी त्रास सहन करावा लागत आहे.
पुणे शहरातही ढगाळ वातावरण असून पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील अनेक भागात पावसाने सकाळीच हजेरी लावली आहे. नाशिकमध्ये सलग चौथ्या दिवशी पावसाची रिमझिम सुरू आहे. या अवकाळी पावसामुळे कांदा आणि द्राक्ष पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.