निप्पाह, झिका, एच वन एन वन आणि आताचा कोरोना व्हायरस अशा कित्येक विषाणूंच्या प्रतिबंधासाठी मुंबई लढली आहे. कोणत्याही विषाणूंचा धोका दाट लोकवस्ती असलेल्या शहराला अधिक असतो.त्यामुळेच केंद्र तसेच राज्य सार्वजनिक आरोग्य विभाग प्रतिबंधात्मक काळजी सतत घेत आहे, तर दुसऱया बाजूला कोरोना व्हायरसचे उपहासात्मक स्टेट्स ठेवून सोशल मीडियावर खिल्लीही उडवली जात आहे.
कोणत्याही विषाणूच्या विरोधात मुंबई लढली आहे. त्यात एचवन एनवनची भीती दर पावसाळ्यानंतर ठरलेली असते. त्यामुळे मुंबईला कोरोना व्हायरसच्या विरोधातील लढाई ही नवीन नाही. सुदैवाने महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण एकही नाही. तसेच जे दाखल झाले ते कोरोना व्हायरस संशयितांच्या वर्गवारीतही मोडत नाहीत. साधी सर्दी-खोकल्याची लक्षण दिसून आल्याने पुण्यातील विषाणू तपासणाऱया एनआयव्ही प्रयोगशाळेत नमुने तपासण्यात देण्यात आले असल्याचे आरोग्य विभाग वारंवार स्पष्ट करत आहे. संपूर्ण देशातील विषाणू तपासणी करणारी प्रयोगशाळा पुण्यात आहे. तर विषाणूजन्य आजारांवर उपचार करणारी दोन्ही अत्याधुनिक रुग्णालये मुंबई व पुणे येथे आहेत. शिवाय रुग्णालयात विलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहेत. कोरोनावरून सध्या गोंधळलेली मनोवस्था आहे. मात्र, घाबरून न जाता प्रतिबंधात्मक काळजी सर्वसामान्यांनी गांभीर्याने घ्यावी. याला कारण कुमकुवत आरोग्य यंत्रणा असलेल्या देशांसाठी कोरोना विषाणू त्रासदायक ठरू शकतो, असा इशारा देत, जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीत आणीबाणी जाहीर केली आहे. डब्लूएचओकडून अशी आणीबाणी फार क्वचितच घोषित केली जाते. चीनमधील वुहांन शहरातील प्रसारानंतर कोरोना व्हायरस जगभरातील 18 देशांमध्ये पोहचला असल्याचे सांगण्यात येत आहे. यात अमेरिकेसह भारतही आहे. मात्र, अशा गंभीर स्थितीत त्या त्या राष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य विभाग कोणत्या प्रकारे परिस्थिती हाताळते त्यावर तेथील संभाव्य विषाणू प्रसार प्रतिरोध अवलंबून आहे. या विषाणूला घाबरून न जाता योग्य खबरदारी घेण्याचे प्रयत्न जगभरात सुरू झाले आहेत. यातून मुंबईसह महाराष्ट्रही सुटला नाही.
कोरोना व्हायरसची गंभीरता सध्या तरी संशोधक सांगण्यास तयार नाहीत. मात्र, ज्या गंभीर पद्धतीने काळजी घेतली जात आहे, त्यावरून स्थितीची कल्पना येते. हा व्हायरस अनेक विषाणूंचा एकत्रित समूह आहे. सार्स विषाणू कुळातील व्हायरस असल्याने मानवातून मानवी शरीरात सहज संसर्ग होत आहे. चीनमधील वुहान हेच प्रसाराचे मूळ असून आता याचा प्रसार भारत, अमेरिका, जपान, कोरियासारख्या देशात झाला आहे. वुहान शहरात डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ापासून कोरोनाची लक्षण दिसलेले रुग्ण आढळले. मात्र, चीनने त्याकडे दुर्लक्ष केले. याच दरम्यान 31 डिसेंबरचा जल्लोष साजरा करणारे जगभरातील प्रवासी या व्हायरसच्या कचाटय़ात आले असल्याचा संशय आहे. आपल्यासाठी गंभीर बाब म्हणजे भारतातील वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी चीनमधील शहरांमध्ये शिकत आहेत. शनिवारी 323 भारतीय प्रवाशांना दुसऱया टप्प्यात चीनहून आणले असले तरी तत्पूर्वी चीनहून परतलेले प्रवासीदेखील आहेत. त्यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंबई परिसरातील म्हणजेच नालासोपारा, कल्याण भागातील हे प्रवासी असल्याने किंचित चिंता वाटली तरीही निव्वळ सर्दी-खोकलाöतापसारख्या लक्षणांमुळे त्यांना दाखल केले असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. दरम्यान, त्यांचे नमुने एनआयव्ही प्रयोगशाळेत पाठवून निगेटिव्ह असल्याचेही स्पष्ट केले. या सर्व संशयितांची नियमित फोनवरून विचारणा (तपासणी) होत आहे. थोडक्यात मुंबईसह महाराष्ट्रातील चीनहून परतलेले सर्व प्रवासी कडक निरीक्षणाखाली आहेत. तसेच मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ असून या ठिकाणी चीनहून येणाऱया प्रवाशांचे थर्मल स्पॅनिंग होत आहे. तसेच चीनमध्ये जाणे आवश्यक असल्यासच जा, अन्यथा चीनचा प्रवास टाळा अशाही सूचना वैद्यकीय तज्ञ देत आहेत. मात्र, त्याचवेळी चीनमधून भारतात येण्यासाठी देण्यात येणाऱया ई-व्हिसावर बंदी घालण्यात आली आहे. चिनी प्रवाशांना जगभरात काही काळासाठी मज्जाव करण्यात येत आहे. हे चित्र आता मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरदेखील दिसून येत आहे. दाट लोकवस्तींच्या शहरात या विषाणूचा संसर्ग खोकला, शिंकेच्या माध्यमातून लगेचच होत असल्याने प्रवास टाळण्यावर भर देण्यात येत आहे. कोरोना व्हायरसचे उगमस्थान मानल्या जाणाऱया चीनमधील वुहान शहराची लोकसंख्या 1 कोटी 11 लाख सांगितली जात आहे. जेमतेम तेवढीच मुंबईची लोकसंख्या आहे. लोकसंख्या तितकीच घनदाट आणि तोडीसतोड असली तरी प्रतिबंधात्मक काळजी मुंबईसह राज्यातील इतर भागातही घेतली जात आहे.
मागच्या काही आठवडय़ात जागतिक आरोग्य संघटनेने आपत्कालीन समिती स्थापन केली. चीनमध्ये मागच्या काही आठवडय़ांमध्ये कोरोना विषाणूचे साडेसात हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले असल्याची माहिती समितीला देण्यात आली. सर्व देशांनी जागरूक राहून आवश्यक त्या उपाययोजनांची नियोजनपूर्वक आखणी करण्यास जागतिक आरोग्य संघटनेकडून सुचविण्यात आले आहे. मात्र, बहुतांश विषाणूजन्य आजारांवर कोणतेच ठोस उपचार नसल्याचे वैद्यकीय तज्ञ सांगतात. त्यामुळे प्रतिबंधात्मक खबरदारी हेच महत्त्वाचे आहे. तसेच महाराष्ट्रासह मुंबईत सध्या थंडी असली तरीही येथे वातावरण बदलते आहे. विषाणू उष्ण वातावरणात टिकत नाहीत. मात्र, दैनंदिन जीवनात बाहेरून आल्यावर साबणाने स्वच्छ हात धुणे, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळणे, आवश्यक वाटल्यास मास्क वापरणे अशा सल्ल्यांवर सध्या भर देण्यात येत आहे. अशा मास्कची विचारणा औषध दुकानांमधून सतत होत आहे. ही विचारणा भीतीतून नव्हे तर सावधगिरीतून असावी. उगीच गर्दी करून मास्कच्या विचारण्यामुळे गोंधळ निर्माण करू नये. कल्याण, नालासोपारा, नांदेडसारख्या उपनगरांची नावे समोर येत असली तरीही मुंबईबाबत अद्याप संशयही व्यक्त केला जात नाही. त्याचवेळी राज्यातील सर्व संशयित प्रवासी निगेटिव्ह असल्याचे सेमवारी एनआयव्हीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, काळजी घेणे आणि व्हायरसबाबतच्या अवास्तव अफवांना महत्त्व न देणेच योग्य ठरेल.
रामकृष्ण खांदारे