अहमदाबाद / वृत्तसंस्था
रणजी चषक स्पर्धेतील बाद फेरीत पोहोचण्याच्या आशाअपेक्षा कायम राखण्यासाठी मुंबईला आजपासून (दि. 3) इलाईट ड गटातील ओडिशाविरुद्ध खेळवल्या जाणाऱया लढतीत कोणत्याही परिस्थितीत एकतर्फी विजय संपादन करणे महत्त्वाचे असणार आहे.
मुंबईचा संघ सध्या 9 गुणांसह गटात आघाडीवर आहे. त्यांनी मागील लढतीत गोव्याला नमवले तर सौराष्ट्रविरुद्ध पहिल्या डावाअखेर आघाडीच्या बळावर वर्चस्व गाजवले. आता मुंबईने ओडिशाला नमवले तर 6 गुणांसह ते 15 गुणांवर पोहोचतील. जर बोनस गुण मिळवता आला तर ते 16 गुणांवर असतील.
सौराष्ट्राचा संघ 8 गुणांसह गटात दुसऱया स्थानी असून गोव्याला नमवल्यास ते 14 गुणांवर पोहोचतील. जर मुंबईने पहिल्या डावाअखेर आघाडी मिळवली आणि सौराष्ट्राने विजय मिळवला तर सौराष्ट्र संघाला पुढील फेरीत आगेकूच करता येईल. साहजिकच, सौराष्ट्र संघ बोनस गुणासह विजय मिळवण्यासाठी महत्त्वाकांक्षी असेल.
कर्णधार पृथ्वी शॉ आणि अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे येथे खराब फॉर्ममधून बाहेर येण्यासाठी हरसंभव प्रयत्न करतील, असा होरा असून युवा फलंदाज सर्फराज खान ओडिशाविरुद्ध आपला मागील फॉर्म कायम राखण्यासाठी उत्सुक असणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवरील या लढतीत धावांचा डोंगर रचण्यासाठी मुंबईला आदित्य तरेकडून देखील बऱयाच अपेक्षा असतील. यापूर्वी, शॅम्स मुलाणीच्या अष्टपैलू खेळामुळे मुंबईने गोव्याला नमवले होते. येथेही डावखुरा शॅम्स पुन्हा एकदा भेदक मारा साकारण्यासाठी अनुभव पणाला लावेल, असे संकेत आहेत.
धवल कुलकर्णीच्या नेतृत्वाखाली मुंबईची गोलंदाजी लाईनअप देखील भक्कम असेल. ओडिशाला केवळ 3 गुण मिळवता आले असून ते बाद फेरीच्या शर्यतीतून यापूर्वीच बाहेर फेकले गेले आहेत. इलाईट ड गटातील आणखी एक लढत सौराष्ट्र-गोवा यांच्यात मोटेरा स्टेडियमवर खेळवली जाणार आहे.