बेंगळूर/प्रतिनिधी
मुंबई कर्नाटक प्रदेशाचे नाव बदलण्यात आल्याची घोषणा कर्नाटक सरकारने केली आहे. यापुढे हा प्रदेश कित्तुर कर्नाटक अशा नावाने ओळखला जाईल अशी माहिती कर्नाटकचे कायदे आणि संसदीय कामकाज मंत्री जेसी मधुस्वामी यांनी दिली. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनीसुद्धा याबाबतची घोषणा केली आहे.
राज्योत्सवादिवशी मुख्यमंत्र्यांची घोषणा
दरम्यान, मुंबई-कर्नाटक प्रदेशाचे नाव बदलून ‘कित्तूर कर्नाटक प्रदेश’ (Kittur-karnatak) असे ठेवण्यात येईल असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई (Basavraj Bommai) यांनी सोमवारी राज्योत्सवादिवशी जाहीर केले होते. सीमेवर अनेकदा वाद उद्भवत असताना जुने नाव कायम ठेवण्यात अर्थ नाही, असे त्यांनी सांगितले होते. मुख्यमंत्री बोम्माई यांनी “आम्ही नुकतेच हैद्राबाद-कर्नाटक प्रदेशाचे नाव बदलून कल्याण कर्नाटक असे ठेवले आहे. आम्ही आता येत्या काही दिवसांत मुंबई-कर्नाटक प्रदेशाचे नाव ‘कित्तूर कर्नाटक’ असे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे,” असे मुख्यमंत्र्यांनी कर्नाटक राज्योत्सवादरम्यान जाहीर केले होते.