बेळगाव /प्रतिनिधी
मुंबई-कर्नाटक प्रदेशाचे नाव बदलून ‘कित्तूर कर्नाटक प्रदेश’ (Kittur-karnatak) असे ठेवण्यात येईल असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांनी सोमवारी जाहीर केले. सीमेवर अनेकदा वाद उद्भवत असताना जुने नाव कायम ठेवण्यात अर्थ नाही, असे त्यांनी सांगितले.
“आम्ही नुकतेच हैद्राबाद-कर्नाटक प्रदेशाचे नाव बदलून कल्याण कर्नाटक असे ठेवले आहे. आम्ही आता येत्या काही दिवसांत मुंबई-कर्नाटक प्रदेशाचे नाव ‘कित्तूर कर्नाटक’ असे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे,” असे मुख्यमंत्र्यांनी कर्नाटक राज्योत्सवादरम्यान जाहीर केले.
कर्नाटक राज्याची निर्मिती झाली त्यावेळी मराठी भाषिक लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे बेळगाव (Belgoan) जिल्हा आणि कर्नाटकातील काही सीमावर्ती प्रदेश महाराष्ट्रात विलीन करण्याची मागणी करणाऱ्या महाराष्ट्रातील राजकारण्यांनी वारंवार केलेल्या दाव्यांचा मुख्यमंत्री स्पष्टपणे उल्लेख करत होते. येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले.