महाविकास आघाडी नेत्यांचा पत्रकार परिषदेत सवाल
प्रतिनिधी/ चिपळूण
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडपट्टीबाबत आजपर्यंत निवेदने, चर्चा, बैठका, अर्ज, विनंत्या करूनही उपयोग होत नसल्याने सर्वांची सहनशीलताही संपली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सर्व भाषणांत ‘मुंबई-गोवा’बाबत त्यांचा शब्द का खाली पडतो, असा सवाल आमदार भास्कर जाधवांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केला. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हय़ात 27 जानेवारी होणारे आंदोलन निर्णायक ठरेल, असेही जाहीर केले.
या संदर्भात शिवसेनेचे आमदार जाधव, जिल्हाप्रमुख सचिन कदम, राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम, तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत आंदोलनामागची भूमिका स्पष्ट केली. यावेळी आमदार जाधव म्हणाले की, राज्यात इतर महामार्ग पूर्ण होत असताना कोकणातील मार्ग मात्र रखडत आहेत, याचे कारण कळत नाही. लोकप्रतिनिधी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे व्यथा मांडतो, अधिवेशनात लक्ष वेधतो. मात्र 11 वर्षे उलटली तरीही महामार्ग पूर्णत्वास जात नाही, हे दुर्दैव आहे. सिंधुदुर्गात 95 टक्के मार्ग पूर्णत्वास गेला. मात्र रत्नागिरी जिल्हय़ातील काही टप्प्यातील काम बंद आहे. कंत्राटदार कंपन्या बदलण्याकडे लक्ष दिले जात नाही. चिपळूण टप्प्यात कंत्राटदार कंपन्या काम करत नसतानाही कारवाई होताना दिसत नाही.
या संदर्भात खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या सूचनेनुसार आघाडीच्या सर्व नेतेमंडळींनी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. 22 रोजी आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे. मात्र लांजामध्ये ज्या पध्दतीने जनतेने सर्व व्यवहार बंद ठेऊन निषेध नोंदवण्याचे ठरवले आहे तसेच राजापूरवासियांनीही करावे, अशी खासदारांची अपेक्षा आहे. चिपळूणकरांनीही त्याच पध्दतीने निर्णय घ्यावा. अपूर्ण महामार्गाचा त्रास सर्वांनाच असल्याने सर्वानीच ही लढाई लढुया, असे आवाहनही जाधव यांनी यावेळी केले.
…