प्रतिनिधी/ रत्नागिरी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाने आता गती घेतल्याचे चित्र आहे. रत्नागिरी जिह्यातून 205 किलोमीटर लांबीचे काम या महामार्गाचे आहे. त्यापैकी 75 किलोमीटरचे काम पूर्णत्वास गेले आहे. उर्वरित कामापैकी 50 किमी जून 2021 तर 88 किमीचे काम जून 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश संबधित ठेकेदार कंपन्यांना देण्यात आले आहेत.
मुंबई-गोवा महामार्गासाठी इंदापूर ते झाराप असे 366.17 किलोमीटरचे काम आहे. हे काम दहा टप्प्यात सुरु आहे. यसाठी 11 हजार 745 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महामार्गाचे काम सुरु होऊन अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. पण महामार्ग पूर्णत्वास जाण्याची प्रतीक्षा आजही कायम आहे. काही टप्प्यात या महामार्गाचे काम रेंगाळले आहे.
या महामार्गाच्या कामांतील दहा टप्प्यापैकी कशेडी ते परशुराम घाट, वाटूळ ते तळगाव, तळगाव ते कळमट आणि कळमट ते झाराप या 4 टप्प्यांचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. येथील मार्गही वाहतुकीसाठी खुला झाला आहे. रेंगाळलेल्या परशुराम ते आरवली आणि कांटे ते वाकेड या 90 किमीच्या कामांनीही गेल्या 4 महिन्यात वेग घेतला आहे. काही भागात काँक्रिटीकरण झाले असून येत्या 6 महिन्यात यातील बहुतांश रस्ते वाहतुकीसाठी सुरु होतील, याची जबाबदारी हॅन कंपनीकडे सोपवण्यात आली आहे.
कामे पूर्ण करण्यासाठी मुदत देऊन केलेय नियोजन
या महामार्गापैकी रायगड जिह्यातील 70.30 किमीचे काम डिसेंबर 2021 तर रत्नागिरी जिह्यातील 130 किमीचे काम पूर्ण करण्यासाठी जून 2022 पर्यंत मुदत दिली आहे. सिंधुदुर्ग जिह्यातील 83 किमीपैकी 80 किमीचे काम पूर्ण झाले असून उर्वरित 2.327 किमी मार्च 2021 पर्यंत पूर्ण होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. या मार्गावरील पुलांच्या कामांनीही वेग घेतला आहे.