प्रतिनिधी/ महाड
मुंबई व कोकणला जोडणाऱया महामार्गावर कशेडी घाटात गुरुवारी रात्री 8 च्या सुमारास कोसळलेली दरड तब्बल 21 तासांनी हटवण्यात यश आले आहे. सुमारे 200 मीटर लांबीचा भरावा रस्त्यावर आल्याने महामार्ग पूर्णतः बंद झाला होता. विन्हेरे-तुळशी खिंड नातूनगर हा पर्यायी मार्गही सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आल्याने रत्नागिरीकडे येणारी वाहतूक ठप्प झाली होती. महामार्गाच्या दोन्ही बाजूला सुमारे 6 किमीपर्यंत अत्यावश्यक सेवेतील व पासधारक वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
गतवर्षीच्या पावसाळय़ातही याच घाटात दरड कोसळून वाहतूक कांही काळ बंद ^झाली होती. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग महाड उपविभागाकडून दुरूस्तीची कोटय़वधींचे कामे करण्यात आली. मात्र, हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या कामांच्या चौकशीची मागणी पोलादपूर ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
गेल्या 2 दिवसापासून पावसाचा जोर वाढल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना गुरुवारी रात्री पोलादपूरपासून 4 किमी अंतरावर असलेल्या धामणदेवी गावाजवळच्या डोगरातील मातीचा भलामोठा भराव महामार्गावर कोसळला. सुदैवाने लॉकडाऊन व सीमाबंदीमुळे यावेळी एकही वाहन या मार्गावरुन जात नव्हते. रात्रीच्या अंधार व पावसाचा जोर यामुळे रस्त्यावरील मातीचा भराव हटवण्यात अनेक अडचणी येत होत्या. सुमारे 200 मीटर लांबीच्या या भरावामुळे आजूबाजूलाही मोठय़ा प्रमाणावर चिखल झाल्याने वाहतुक पुर्णपणे बंद करण्यात आली होती.
पोलादपूरचे सहायक पोलीस निरीक्षक यशवंत बोडकर, नायब तहसीलदार समीर देसाई, महामार्ग विभागाचे विक्रम गुंजाळ धायगुडे यांनी व त्यांच्या सहकारी घटनास्थळी कार्यरत होते. खेडकडून येणारी वाहतूक नातूनगरवरुन तुळशी खाडी रस्त्याने महाडकडे वळविण्यात आली. परंतु हा मार्गही रत्नागिरी प्रशासनाकडून बंद करण्यात आल्याने ही वाहतूकही थांबवण्यात आली. कोणत्याच रस्त्याने वाहने जाऊ शकत नसल्याने दोनही बाजूला 5 ते 6 किलोमिटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या,
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदीकरणाचे काम करीत असलेल्या एलऍन्डटि कंपनीचे अधिकारी देखिल घटनास्थळी रवाना झाले. कंपनीने चार पोकलॅड, सहा जेसीबी आणि दहा ट्रकच्या मदतीने दरड काढण्याचे काम सुरु करण्यात आले. रात्रीच्या अंधारामध्ये काम करताना अनेक अडचणी येत असल्याने शुक्रवारी पहाटेपासून वेगाने कामाला सुरूवात करण्यात आली असून सायंकाळपर्यंत महामार्ग वाहतुकीला खुला करण्यांत येईल, असा विश्वास महामार्ग विभागाचे उप कार्यकारी अभियंता गायकवाड यांनी व्यक्त केला.
मुंबई-गोवा महामार्गावरील अत्यंत महत्वाचा असलेल्या घाट मार्गावर सातत्याने दरडी कोसळण्याच्या घटना घडत असताना महामार्ग विभागाकडून योग्य ती दुरुस्ती केली जात नसल्याच्या वांरवार तक्रारी करण्यात येत आहेत. याच गावाजवळ चौपदरीकरणाचे काम सुरु असून गेल्या काही दिवसापासून रस्ता रुंदीकरणासाठी सुरुंगाचाही वापर केला जात होता. त्याचबरोबर जवळच महामार्गावरील बोगद्याचे कामही सुरु असल्याने तेथील सुरुंगाचे हादरे देखिल घाट रस्त्यालगत असलेल्या डोगरांना बसत होते. पावसाळ्य़ामध्ये डोगरांतून दरडी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. सुरक्षितेच्या दृष्टीने योग्य ते उपाय योजणे आवश्यक असताना दुर्लक्ष करण्यात आल्याने कशेडी घाट रस्त्यावर पावसाळ्य़ामध्ये दरडी कोसळण्याचा धोका कायम राहिला आहे. लवकरात-लवकर रस्त्याचे चौपदीकरण करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.