ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खोपोलीजवळच्या बोरघाटात आज सकाळी साडेसहाच्या सुमारास सहा वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर आठ जण जखमी झाले आहेत. त्यामधील तिघांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना एम. जी. एम. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर बोरघाटात आज सकाळी साडेसहाच्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर एका ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने सहा वाहनांची एकमेकांना जोरदार धडक बसली. यात ट्रक आणि टेम्पोच्या दरम्यान एक कार आल्याने चारचा चक्काचूर झाला. कारमधील चारजण जागीच ठार झाले. तर इतर वाहनांमधील 8 जण जखमी झाले. त्यामधील तीन जण गंभीर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गौरव खरात (36), सौरभ तुळसे (32), सिद्धार्थ राजगुरू (31) अशी अपघातातील मृतांची नावे असून, एकाची ओळख अद्याप पटली नाही.
दरम्यान महामार्ग पोलीस, डेल्टा फोर्स, देवदूत यंत्रणा अपघातग्रास्तांच्या मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले. या तिन्ही संस्थेच्या सदस्यांनी वेगाने मदतकार्य करत अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरुन बाजूला केली. सध्या या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत झाली आहे.