ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबई, पुणे येत्या 10 दिवसांसाठी बंद करण्यात येणार असल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, या केवळ अफवा आहेत, अशा प्रकारच्या मेसेजवर कोणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.
राज्यातील मुंबई आणि पुणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने येत्या शनिवारपासून 10 दिवस ही दोन्ही शहरे पूर्णपणे बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्वांनी आवश्यक वस्तूंचा साठा करून ठेवावा. दहा दिवस ही शहरे लष्कराच्या ताब्यात असतील, असे खोटे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या मेसेजमध्ये कोणतेही तथ्य नसून, हा एक प्रकारचा खोडसाळपणा आहे. अशा प्रकारच्या मेसेजवर कोणीही विश्वास ठेवू नये. तसेच असे खोटे मेसेज कोणीही फॉरवर्ड करू नयेत, अन्यथा संबंधित सोशल मीडिया ॲडमीनवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा राज्य सरकारकडून देण्यात आला आहे.