मराठी चित्रपट, मालिकांच्या कोल्हापुरातील चित्रीकरणाला विरोध : देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव
प्रतिनिधी / कोल्हापूर
मुंबई, पुण्याच्या चित्रपट निर्माते, मालिका निर्मात्यांना कोल्हापुरात चित्रीकरण करण्यासाठी निमंत्रण देण्यास भाजपचे माजी अध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी विरोध केला आहे. लॉकडाऊनमध्ये जिल्हय़ातर्गंत शिथिलता देण्यात आली आहे. चित्रपट अथवा दूरचित्रवाहिनीवरील मालिका या अत्यावश्यक सेवेत येत नाहीत. स्थानिक असंघटीत क्षेत्रात कामगार, घरकाम करणाऱया महिला कामगार यांना अद्याप कामावर जात येत नाहीत. त्यांना लॉकडाऊनचे नियम आहेत, मात्र चित्रपट, मालिका निर्मात्यांना कोल्हापुरात येण्यासाठी रेड कार्पेट का टाकले जात आहे, असा सवालही जाधव यांनी उपस्थित केला आहे.
महेश जाधव यांनी एक व्हिडिओव्दारे आपले मत मांडून ते व्हायरल केले आहे. जाधव यांनी म्हटले आहे की ः सध्या जिल्हय़ात लॉकडाऊनची अंमबजावणी चांगल्या प्रकारे सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने चांगल्या प्रकारे यंत्रणा राबविली आहे. कोल्हापूरच्या जनतेनेही स्वतःही लॉकडाऊनच्या काळातील नियम पाळले आहेत. त्यामुळे कोल्हापुरातील स्थिती नियंत्रणात आहे. अशा स्थितीत पुणे, मुंबईतील चित्रपट आणि मालिकांच्या निर्मात्यांना कोल्हापूर जिल्हय़ात चित्रीकरण करण्यासाठी येण्याचे आमंत्रण देण्याचा निर्णय अयोग्य वाटतो. कारण सध्या देशातील सर्वाधिक कोरोनाचे रूग्ण मुंबई आणि पुण्यात आहेत. तेथे चित्रीकरण बंद आहे. अशावेळी त्यांना कोल्हापुरात येण्यास सांगणे धोकादायक आहे. चित्रीकरणासाठी निर्माते आले तर त्यांच्याबरोबर लाईटमन, मेकअपमन, स्पॉटबॉयपर्यंत विविध प्रकारच्या असंख्य लोकांचा स्टाफ येणार हे उघड आहे. त्यातील काही जण चित्रीकरण झाल्यानंतर शहरात, गावात फिरत राहतील. त्यातील जर कुणी कोरोना बाधित असेल, तर त्यातून कोल्हापुरात संसर्ग वाढण्याचा धोका आहे. सध्याच्या स्थितीत पाहिल्यास सरकारने अत्यावश्यक सेवांना सशर्त परवानगी दिली आहे. चित्रपट अथवा चित्रपट मालिका अत्यावश्यक सेवेत येत नाहीत. त्यामुळे पुढील वर्षभर कोरोनाचे संकट टळेपर्यंत मुंबई, पुण्याच्या निर्मात्यांना कोल्हापुरात चित्रीकरण करण्यास परवानगी देवू नये.
जिल्हा प्रशासनाचा दुजाभाव
जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, कृती समितीचे कार्यकर्ते, पदाधिकारी कोरोनासंदर्भातील जनतेविषयक प्रश्न, अडचणी मांडण्यासाठी जात असतो. तेंव्हा अधिकारी मंडळी दोघे जण आत या, असे सांगत असतात. मात्र उद्योजक, व्यापाऱयांच्या प्रश्नांसंदर्भातील चर्चा, निवेदनावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व्यापारी, उद्योजकांबरोबर आठ दहा जण बसलेले दिसतात. चित्रनगरीच्या पाहणीवेळीही पालकमंत्र्यांबरोबर अनेक लोक होते. आज सत्ता बदलली म्हणून अधिकाऱयांनी वेगळी वागणूक कार्यकर्त्यांना देवू नये. सत्ता येते जाते, हे त्यांनी विसरू नये, असा टोलाही महेश जाधव यांनी जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांचे नाव न घेता लगावला.